कोलंबो – श्रीलंकेतील वाढती महागाई तसेच देशातील गेल्या काही महिन्यांपासून देशात असलेली अराजकता यांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याने भारतीयांना भावनिक आवाहन केले आहे. पर्यटनासाठी या व आमच्या देशाला आर्थिक अराजकतेतून बाहेर काढा, असे आवाहन त्याने केले आहे.
भारतीयांनी जास्तीजास्त संख्येने श्रीलंकेला भेट दिली तर येथिल नागरिकांना रोजगार मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून आमचा देश पुन्हा एकदा स्थैर्य मिळवेल. भारतीयांनी आमच्या देशाला भेट दिली तर त्यामुळे आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेला या स्थितीतून बाहेर पडण्यास मदत होइल, असे मत श्रीलंकेतील पर्यटनाचा ब्रॅंड ऍम्बेसिडर असलेल्या जयसूर्याने मत व्यक्त केले आहे.
श्रीलंकेच्या वाणिज्य दूतावासाकडून आयोजित एक कार्यक्रमात उपस्थित राहिलेला असताना त्याने हे आवाहन केले आहे. आमच्यासाठी गेले चार महिने खूप कठिण होते. भारतासह अनेक देशांत आमच्या देशातील स्थितीचे वृत्तही सातत्याने प्रकाशित होत होते.
पर्यटनाच्या क्षेत्रात श्रीलंकेला मदत करण्याची गरज असून ते काम भारतीय पर्यटकच करु शकतात. आमचा देश लहान असल्याने पर्यटनावरच जास्त अवलंबून आहे. येणाऱ्या पर्यटकांना देण्यासाठी श्रीलंकेकडे खूप काही आहे. सध्याच्या आम्हाला भारताकडून ही मदत हवी आहे, असेही त्याने सांगितले.