मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात तब्बल 0.50% ची वाढ केल्यामुळे स्वस्त आणि मध्यम किमतीच्या घराच्या विक्रीवर लघु पल्ल्यात परिणाम होण्याची भीती विकसक आणि या क्षेत्रातील कन्सल्टंटनी व्यक्त केली आहे. भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर वाढलेल्या महागाइला लगाम घालण्यासाठी रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करणे अपेक्षित होते. मात्र ही व्याजदरवाडढ अपेक्षा पेक्षा थोडी जास्त झाली असल्याचे दिसून येते. या अगोदर रिझर्व्ह बॅंकेने दोन टप्प्यात 0.90% ची व्याजदर वाढ केली होती.
आता त्यात 0.50% ची भर पडल्यामुळे तीन महिन्यात झालेली व्याजदर वाढ 1.40% इतकी आहे. ऍनारॉक या संस्थेचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले की, रिझर्व्ह बॅंकेने पुन्हा केलेल्या व्याजदरवाढीमुळे घरासाठीच्या कर्जावरील व्याजदर वाढण्याबरोबरच विकसक घर तयार करण्यासाठी घेणाऱ्या कर्जावरील व्याजदर वाढणार आहेत.
त्यामुळे घरासाठी स्वस्त कर्जाचा जमाना आता संपुष्टात आला आहे. या अगोदर घरासाठीच्या कर्जावरील व्याजदर कमी होते. त्यामुळ रिऍल्टी क्षेत्रामध्ये तेजी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सिमेंट,पोलाद, कामगाराचा पगार आणि इतर कच्च्या मालाचे दर वाढत असतानाच कर्जावरील व्याजदरात वाढ झाल्यामुळे या क्षेत्रावर जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर घरांच्या किमती वाढू शकतात. घराचे व्याजदर वाढले आणि किमती वाढल्या की कमी उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटातील लोक खरेदी करण्यासाठी टाळाटाळ करतात. मात्र जास्त किमतीच्या घराच्या विक्रीवर दरवाढीचा फार परिणाम होण्याची शक्यता नाही असे त्यांनी सांगितले.
तीन टप्प्यात केलेल्या व्याजदर वाढीमुळे ग्राहकांची क्रयशक्ती अकरा टक्क्यांनी कमी होते. याचा अर्थ अगोदर जर एखादा ग्राहक एक कोटी रुपयांचे घर विकत घेण्याचा विचार करीत असेल तर तो आता 89 लाख रुपयाचे घर विकत घेण्याच्या शक्यतेवर विचार करू शकतो. मात्र हा परिणाम फक्त काही काळ मर्यादित राहणार आहे. दीर्घ पल्ल्यांमध्ये रिऍल्टी क्षेत्राचे भवितव्य चांगले आहे.