पुणे – महागाई हाताबाहेर जाणार नाही या आशेने गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदरात कसलीही वाढ केलेली नाही. मात्र नंतर किरकोळ महागाईचा दर सात टक्क्याच्या जवळ गेल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शक्य तितक्या लवकर रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये पुढील एक वर्षात रिझर्व्ह बॅंक टप्प्याटप्प्याने व्याजदरात किमान एक टक्का वाढ करील असे गृहीत धरले जाऊ लागले आहे. या परिस्थितीमध्ये ज्यांनी विविध कामासाठी कर्ज घेतले आहे, अशा व्यक्तींच्या कर्जाच्या हप्त्याच्या रकमेत त्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित आहे.
सध्या रिझर्व्ह बॅंकेचा रेपो रेट चार टक्के असला तरी व्यावसायिक बॅंका ग्राहकांना विविध कर्जावर साधारणपणे साडेसात टक्के व्याजाने कर्ज देतात. जर पुढील एक वर्षामध्ये या व्याजदरात एक टक्का वाढ झाली तर हा व्याजदर 8.5 टक्के इतका होऊ शकेल. अशा अवस्थेमध्ये कर्जांवरील हप्ताही त्या प्रमाणात वाढणार आहे.
50 लाख रुपयाचे कर्ज 15 वर्षासाठी घेतले असल्यास त्यावर सध्या जर हप्त्याची रक्कम 46,350 रुपये असेल तर ती वाढून 49,236 रुपये इतकी होईल. म्हणजे या कर्जाच्या हप्त्याच्या रकमेत प्रत्येक महिन्याला 2,886 रुपयांची वाढ होणार आहे. जर व्याजदर सध्याच्या 7.5 टक्क्यावरून नऊ टक्के झाले तर व्याजदरात दीड टक्का वाढ झाल्यासारखे होईल. अशा परिस्थितीमध्ये या मासिक हप्त्याच्या रकमेत वाढ होऊन त्या हप्त्याची रक्कम 50,713 रुपये इतकी होईल. म्हणजे संबंधित व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 4,362 रुपये अधिक मोजावे लागतील.
महागाई वाढल्यानंतर वाढणाऱ्या व्याजदरामुळे कर्ज घेतलेल्या नागरिकांच्या जमाखर्चावर अशा प्रकारे परिणाम होऊ शकत असतो. त्यामुळे जे लोक कर्जाचे हप्ते भरीत आहेत त्यांना आगामी काळासाठी या अतिरिक्त रकमेची तरतूद करावी लागणार आहे