सातारा – कराड उत्तरचे नेते अडीच वर्षे पालकमंत्री होते. आमदार फंड सोडून त्यांनी काहीच कामे केली नाहीत. त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य जनतेला त्रास द्यायचा उद्योग केला. त्यांनी अनेकांच्या नोकऱ्या घालवल्या. फार कोत्या मनाचा माणूस पालकमंत्री झाला होता. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना जनतेच्या व्यथा समजल्याच नाहीत. त्यामुळे आता जनतेने सावध होऊन कराड उत्तरची भाकरी फिरवावी, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी केले.
कराड उत्तर मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे आयोजित भाजप संवाद यात्रा मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, सुनील शिंदे, महेश जाधव, महेश वारगे, बाळूआप्पा थोरात, विश्वास माने, तुषार माने, अनिल पिसाळ, सचिन पिसाळ आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भागातून बंगळुरूला ग्रीन कॉरिडॉर हायवे जाणार असल्याने विकासाची नवनवीन दालने खुली होणार आहेत.
या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी भाजप आणि धैर्यशील कदम यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचे आवाहन त्यांनी केले. विश्वासघात करुन पाठीत खंजीर खुपसणे आणि फसविणे हे जन्मजात धंदे असलेल्या पवारांनी अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणले. खरे तर पवारांचा राजकीय जन्मच तत्कालीन नेत्यांना फसवून आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून झाला होता.
त्यांचा अपशकुन इतका मोठा होता की ते सरकार आल्या आल्या महाभयंकर करोनाची लाट आली. करोना काळात आघाडीचे सरकार झोपले होते. त्यांचे मुख्यमंत्री जनतेला वाऱ्यावर सोडून क्वारंटाइन झाले होते, असा घणाघात गोरे यांनी केला. भाजप आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या भागाचा विकास करण्यात कुठेच कमी पडणार नाही, असे धैर्यशील कदम यांनी सांगितले. गेल्या अडीच वर्षात कोणतीच विकासकामे झाली नसल्याचे सांगत मेळाव्यात उपस्थितांनी अन्यायाचा पाढा वाचला. त्यावर आ. गोरेंनी “आता आपले सरकार आहे, आपली कामे निश्चित होतील,’ असा विश्वास दिला.
जिल्ह्यातून दोन हजार बाटल्यांचा रक्तसाठा …..
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्यात भाजपच्यावतीने जिल्हाभर रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत. त्यातून दोन हजार बाटल्या रक्तसाठा केला जात आहे. मोदींनी सुरु केलेल्या अनेक लोककल्याणकारी योजनांचा प्रत्येक भारतीय लाभार्थी आहे. यापुढेही भाजप सर्वसामान्य जनतेशी बांधिलकी जपून देशाला आणखी प्रगतीपथावर नेण्यास कटीबद्ध असल्याचे आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले.