कोलकाता – तृणमूल कॉंग्रेसचे 21 नेते अजूनही माझ्या थेट संपर्कात आहेत, असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते आणि अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. हे 21 आमदार आपल्या संपर्कात असल्याचे मी अगोदरही म्हटले होते व आताही तेच सांगतो आहे. योग्य वेळेची वाट पाहा असेही त्यांनी नमूद केले. मात्र या तृणमूलच्या आमदारांना भाजपमध्ये घेण्यास आमच्या काही लोकांचा आक्षेप आहे. आम्हाला नसलेले लोक नको आहेत, असे या लोकांचे म्हणणे आहे.
तेव्हा आपण मूर्ख नसून पुन्हा तीच चूक करणार नसल्याचे आपण त्यांना सांगितले असल्याचे ते म्हणाले. दुर्गा पूजेनिमित्त तयारी करण्यासाठी मिथुन कोलकाता येथे आले होते व यावेळी त्यांनी बैठक घेतली. पत्रकारांनी नेमके किती आमदार तुमच्या संपर्कात आहेत, अशी विचारणा केल्यावर ते म्हणाले की, नेमका आकडा मी तुम्हाला सांगणार नाही. पण 21 लोक आहेत असे तुम्ही समजा.
दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांचा जो दुरपयोग होतो आहे त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात नसल्याचे अलीकडेच प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. त्यावर भाष्य करताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, त्या बरोबरच बोलल्या आहेत. पंतप्रधान त्यात काही करत नाहीयेत.
न्यायालयाने तसे आदेश दिल्यावर आम्ही काय करणार? भारतीय जनता पार्टीने ममता यांच्याबाबत काय चुकीचे केले आहे याचा खुलासा त्यांनी करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही स्वच्छ असाल तर घरी जाउन शांत झोपू शकतात. काहीही होणार नाही. मात्र काही पुरावा असेल तर पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही तुम्हाला वाचवू शकणार नाहीत.