बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकास्त्र
बारामती – बारामतीत घराणेशाही सुरू असून भ्रष्टाचार देखील मोठ्या प्रमाणात आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत बारामतीला शंभर टक्के गुण मिळतील. घरणेशाही व भ्रष्टाचारविरोधात भाजप काम करीत असून बारामतीत देखील अशा पद्धतीचे कामकाज होईल. बोगस मतदान ही रोखले जाईल, असा घणाघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला.
बारामती शहरातील भाजपा पक्ष कार्यालयाला भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मंत्री सीतारामन यांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे, भीमराव तापकीर, राहुल कुल, आमदार माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, योगेश टिळेकर, चंद्रराव तावरे, रंजन तावरे, सुनील पोटे, गणेश भेगडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, अंकिता पाटील-ठाकरे, राजवर्धन पाटील आदी उपस्थित होते.
सीतारामन म्हणाल्या की, भाजपचे चरित्र असे नाही. ज्या बारामती मतदारसंघाच्या विकासाचा बोलबोला आहे, तेथे प्रत्यक्षात काही भाग सोडता अन्य ठिकाणी विकासाची वानवा आहे. येथे एकाच कुटुंबावर छप्परफाड सोने पडते आहे.
देशाच्या विकासासाठी गाव, जिल्हा ते राज्याचा विकास व्हायला हवा. मग इथे भाजपला का टार्गेट केले जात आहे, असा सवाल करून त्या म्हणाल्या, ज्या पक्षाच्या नावात राष्ट्रवाद आहे त्यांच्याकडून हे अपेक्षित नाही. त्यांचा पक्ष नॅशनॅलिस्ट नसून डायनास्टिक असल्याचे त्या म्हणाल्या. येथे पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी मी दौरा करत असताना वातावरण एवढे गरम का, असा सवाल त्यांनी केला. दिल्लीपासूनच हवा फिरली असून त्याचा प्रत्यय लवकरच येईल, असा इशारा त्यांनी दिला.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांना टार्गेट
सीतारामन म्हणाल्या की, तालुक्यातील अनेक गावांना अद्याप पाणी नाही. समतोल विकास झाला नाही. एकाच भागात सर्व सुविधा निर्माण झाल्या आहेत. भाजपचे आमदार, लोकप्रतिनिधी असलेला भाग जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवला आहे. भाजपचा पदाधिकारी, कार्यकर्ता असेल तर त्याला टार्गेट केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेतृत्व करीत आहेत. देशातील 114 अविकसित जिल्ह्यांसंबंधी सध्या ते काम करीत आहेत. त्यातील अनेक जिल्हे भाजपशासित नाहीत; परंतु विकासात राजकारण न आणता समतोल विकास साधण्यासाठी दरमहा पंतप्रधान तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत आहेत.
आमचा लढा घराणेशाहीविरोधात
भाजप हा घराणेशाहीच्या विरोधात आहे. पक्षातील अनेकांनी महत्त्वाची पदे भूषवली. त्यात सर्व जाती, धर्म, पंथाचे लोक आहेत. देशात कॉंग्रेसने घराणेशाहीचे राजकारण केले. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले. आमचा लढा घराणेशाहीविरोधात आहे. जे पक्ष घराणेशाही चालवतात ते स्वतःच्याच घरातील लोकांना पुढे करतात. अमेठी, रायबरेलीत गेल्या 50 वर्षात झाला नव्हता एवढा समतोल विकास सध्या सुरू आहे. हे विकासाचे सूत्र लक्षात घेऊन आम्ही काम करत आहोत.