नगर -सप्टेंबर महिन्यातही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. हा अति पाऊस आता पिकांसाठी मारक ठरू लागला आहे. आतापर्यंत हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. आता या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी सुरू केल्या आहेत. याबाबत कृषी विभागाने महत्वाचे आवाहन केले आहे.
विमाधारक शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानीची पूर्वसूचना घटना घडल्यानंतर 72 तासांच्या आत विमा कंपनीला कळवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आता ही अट लक्षात ठेवणे महत्वाचे राहणार आहे.
केंद्र सरकारने खरीप व रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेत जिल्ह्यातील सव्वा दोन लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारींचा पाऊस पाडला आहे. कंपनीकडून कृषी विभागाच्या मदतीने या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनीही नुकसानीची घटना घडल्यानंतर 72 तासांच्या आत कंपनीला घटनेची माहिती द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांनी पाडला तक्रारींचा पाऊस
जिल्ह्यातील मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारींचा पाऊस पाडला आहे. आतापर्यंत 15 हजार 25 पीक नुकसानीच्या तक्रारी कंपनीला मिळाल्या आहेत. यामध्ये नगर 179, कर्जत 137, संगमनेर 122, अकोले 37, श्रीगोंदा 254, जामखेड 833, नेवासा 3131, शेवगाव 1536, राहुरी 1136, राहाता 3531, श्रीरामपूर 415, पारनेर 197, पाथर्डी 1603 आणि कोपरगाव तालुक्यातून 2094 तक्रारी मिळाल्या आहेत.
अशी द्या पीक नुकसानीची माहिती
-गुगल प्ले स्टोअरवर क्रॉप इन्शुुरन्स ऍप उपलब्ध आहे. ऍपद्वारे माहिती देता येईल.
-एचडीएफसी इर्गो कंपनीच्या 18002660700 या टोल फ्री क्रमांकावरही पीक नुकसानीची माहिती देता येईल.
-विमा कंपनीने तालुका पातळीवर प्रतिनिधी नियुक्त केले आहेत, या प्रतिनिधींनाही माहिती देता येईल.
-तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पूर्वसूचना देता येईल.
-विमा कंपनीच्या 7304524888 या व्हॉट्सऍप क्रमांकावरही पीक नुकसानीची माहिती देता येईल.