कात्रज, दि. 22 (प्रतिनिधी) -कात्रज, भारती विद्यापीठ, धनकवडी, आंबेगाव पठार भागांतील चौकांसह मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी बैठकांवर जोर दिला आहे. तर, तासन्तास कोंडी फुटत नसल्याने वाहनचालक आणि परिसरातील व्यावसायिक वैतागले आहेत.
या संदर्भातच भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस विभागाने दि.21 सप्टेंबर रोजी बैठक आयोजित केली होती. यावेळी सामाजिक संस्था, शांतता समिती सदस्य, पत्रकार, जागरूक नागरिक उपस्थित होते.
भारती विद्यापीठ वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक दादासाहेब चुडप्पा म्हणाले, “भारती विद्यापीठ, स्वारगेट सातारा रस्ता, कात्रज मुख्य चौक कोंढव्याकडे जाणारा रस्ता, कात्रज व धनकवडी परिसरातील जागोजागी चौक तसेच मुख्य रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी बाबत फक्त वाहतूक पोलिसांनाच प्रशासनाने जबाबदार धरून चालणार नाही. यासाठी महानगरपालिका प्रशासन देखील तेवढेच जबाबदार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने आवश्यक त्या उपाययोजना व पायाभूत सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे. तसेच लोक सहभागाची नितांत आवश्यकता आहे.’
पोलिसांच्या नजरेतून कोंडीची कारणे
कात्रज चौकात वाहतूक कोंडी न होण्यासाठी पीएमपी बस थांब्याजवळ उजवीकडे वळू नये. याबाबत बोर्ड लावूनही पीएमपी बसचालक त्याकडे दुर्लक्ष करतात. याबाबत सहा बसेसला दंड ठोठावण्यात आला आहे. वाढलेली लोकसंख्या, बेकायदा इमारती बांधून पार्किंगची सोय नसल्याने वाहने रस्त्यावर लावण्यात येतात. गाळेधारकांनी त्यांचे पोटभाडेकरू ठेवल्यामुळे, रस्त्यावर वाहनांची गर्दी होत आहे. या सर्व बाबींवर बोट ठेवत या बैठकीमध्ये वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मंथन करण्यात आले.
जेथे वाहतूक कोंडी होते त्या रस्त्यांवर सिग्नलचे प्रमाण कमी अंतरावर आहे. दुभाजकांची आवश्यकता असून अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतूक मंदावते. रस्त्यावर पांढरे पट्टे, झेब्रा पट्टे, गतिरोधक आवश्यक आहेत.