पारगावच्या गुऱ्हाळ मालकांचा एकमुखी निर्णय ः संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनास यश
पारगाव – दौंड तालुक्यातील पारगाव येथे गुऱ्हाळघरांच्या धुराच्या प्रश्नावरून संभाजी ब्रिगेड व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गुऱ्हाळ चालकांना धारेवर धरले होते. तसेच प्रदुषण बंद न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयात कचरा फेको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने पारगाव हद्दीतील सर्व गुऱ्हाळ चालकांना कचरा न जाळण्याच्या संदर्भात नोटिस दिल्या होत्या. त्यावेळी गुऱ्हाळ मालकांनी पारगाव येथील रेणुका दूध डेअरी येथे एकत्र येत यापुढे कोणत्याही गुऱ्हाळावर कचरा जाळला जाणार नाही. तसेच गुळामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ होणार नाही याची ग्वाही दिली.
यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाष बोत्रे,माजी सरपंच सुरेश ताकवणे, लक्ष्मण ताकवणे, नानासाहेब जेधे, विजय चव्हाण, राजहंस ऋणवाल, शामराव ताकवणे, तुकाराम ताकवणे, अमोल बोत्रे, हरिदास बोत्रे, आदी गुऱ्हाळ मालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी गुऱ्हाळ मालकांच्या वतीने माजी उपसरपंच सोमनाथ ताकवणे यांनी गुऱ्हाळांच्या बाबतीत सांगीतले की, मागील वर्षी पारगावच्या आसपासच्या 25 ते 30 किलोमीटर अंतरावरील कारखान्यांसाठी ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्यांना 10 ते 15 हजार रूपयांचा भुर्दंड बसला आहे. आपल्याकडे गुऱ्हाळघरे असल्यामुळे शेतकऱ्यांवर ती वेळ आली नाही. गावच्या आर्थिक जडणघडणीत गुऱ्हाळ घरांचा खारीचा वाटा आहे. पान दुकानांपासून ने कापड दुकानापर्यंत यांचा फयदा होत आहे.
गुऱ्हाळ घरांमध्ये आधुनिकीकरण झाल्यास ही समस्या भेडसावणार नाही, परंतु थोडा वेळ लागेल आम्हाला समजून घ्यावे, आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यासाठी बदलला पाहीजे. पंचायत समितीचे उपसभापती सयाजी ताकवणे यांनी सांगितले की, कोणीही यापुढे कचरा, खराब साखर आदींचा वापर करू नये. कोल्हापूरचा गूळ परदेशात जातो. आपलाही कसा जाईल यासाठी प्रयत्न करावा. आज पारगाव येथील धूर प्रदूषणाचा प्रश्न सुटला आहे. यामध्ये किती सातत्य राहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पारगावच्या गुऱ्हाळ मालकांचा आदर्श पूर्ण तालुक्याने घेतला तर बहुतांश प्रमाणात दौंड तालुका प्रदूषण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही.
प्रदूषण व भेसळी बाबतीत आमचा लढा चार वर्षांपासून ग्रामपंचायतीशी आहे. गावातील तरकारी करणारा शेतकरी अडचणीत आला आहे. मधमाशी नष्ट झाल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक गुऱ्हाळ मालकाने 10 मधमाशी पेटी लावल्या पाहिजेत.
– संभाजी ताकवणे, संचालक मार्केट कमिटी दौंड
गुऱ्हाळ मालकांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यापुढेही असेच सहकार्य करणे गरजेचे आहे. जेणेकरुन तालुक्याचे नाव खराब होणार नाही.
– स्वरूप ताकवणे, उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड दौंड तालुका