महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लहान मुले पळवणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा सध्या विविध समाजमाध्यमातून पसरवली जात आहे. ती निश्चितच धोकादायक आहे. दोन दिवसांपूर्वी पोलीसप्रमुखांना या घटनेची दखल घेऊन जाणीवपूर्वक अशा प्रकारची कोणतीही स्थिती नसल्याचा खुलासा करावा लागला आहे. तरीसुद्धा लोकांचा अद्यापही समाजमाध्यमातून फिरणाऱ्या व्हायरल व्हिडिओजवर आणि मेसेजेसवर अंधविश्वास असल्याने हा अफवांचा बाजार रोखायचा कसा, याबाबत आता गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात एके ठिकाणी काही साधूंना मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून जोरदार मारहाण करण्यात आली होती. अशीच घटना काही वर्षांपूर्वी पालघर जिल्ह्यातही घडली होती आणि त्यामुळे धार्मिक तणाव निर्माण झाला होता. साहजिकच जातीय आणि धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक कोणी अफवांचा बाजार गरम करत आहेत का, यावर आता पोलिसांना लक्ष द्यावे लागणार आहे. मुले पळवणारी टोळी कार्यरत असल्याच्या बातम्यांच्या अफवांमुळे प्रत्येकाकडे संशयाने पाहिले जात आहे आणि केवळ सहानुभूतीच्या किंवा मदतीच्या भावनेतून एखाद्या लहान मुलाशी बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीवरही हल्ला करण्याचे प्रकार होत आहेत. अशा प्रकारचे हल्ले झाल्यामुळे त्या व्यक्तीचे वैयक्तिक शारीरिक आणि मानसिक नुकसान होत असले, तरी जेव्हा या अफवा सामाजिक पद्धतीच्या असतात तेव्हा त्यातून सामाजिक वैरभाव निर्माण होऊन दंगलीसारखे प्रकारही घडतात. ही गोष्ट या ठिकाणी विसरून चालणार नाही. काही वर्षांपूर्वी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची अफवा पसरल्याने आणि त्यावर उलटसुलट मतप्रदर्शन झाल्यानंतर एकाला आपला जीव गमवावा लागला होता आणि अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात दंगलीही घडल्या होत्या, हेसुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यावे लागेल.
भारतासारख्या मोठ्या देशात लोकसंख्येपेक्षा मोबाइलच्या संख्येचे प्रमाण जास्त झाले आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. या उपकरणाला स्मार्टफोन म्हटले जात असले, तरी या स्मार्ट फोनवर येणाऱ्या माहितीचा उपयोग स्मार्टपणे केला जातोच असे नाही. मोबाइलवर विविध समाजमाध्यमांच्या निमित्ताने येणारा मजकूर खराच आहे, ही जी मानसिकता सर्वसामान्य नागरिकांची तयार होऊ पाहात आहे ती निश्चितच धोकादायक आहे. आपण जो मजकूर वाचत आहोत किंवा जो व्हिडिओ पाहात आहोत तो खराच आहे हे गृहीत धरून त्यावरून आपले मत तयार करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मोबाइलवर आलेली माहिती खरी आहे का खोटी आहे, याची कोणतीही शहानिशा न करता त्यावर मतप्रदर्शन करून असे मेसेज फॉरवर्ड करण्याकडे अनेकांचा कल असल्याने ही माहिती मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. तसेच त्याच प्रमाणात नुकसानही होऊ शकते. अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या खोट्या बातम्यांमुळे जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीचा लाभ घेण्याची वाट नेहमीच समाजकंटक पाहात असतात. त्यामुळे दंगली, लुटालूट आणि मारामारी यासारखे प्रकार घडत राहतात.
मुळात एखादी गोष्ट घडली नसताना ती घडली असे गृहीत धरून जी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते, तिला पुन्हा प्रतिक्रिया दिली जाते. त्यातूनच पुढे ही परिस्थिती अधिक गंभीर होत राहते. मुळात जी क्रिया घडलीच नाही त्या क्रियेला घाईघाईने प्रतिक्रिया देण्याची ही मानसिकता गेले दिवसेंदिवस जास्त धोकादायक बनत चालली आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकानेच स्मार्टली या सर्व गोष्टींकडे बघण्याची गरज आहे. आपल्या मोबाइलवर आलेला कोणताही मेसेज शहानिशा न करता फॉरवर्ड केला नाही, विशेषत: जे मेसेज असे वादग्रस्त आणि दंगली किंवा लुटालुटीला कारणीभूत ठरणारे असू शकतात ते फॉरवर्ड न करण्याचा नियम प्रत्येकाने केला तर या अफवांच्या बाजारावर काही प्रमाणात नियंत्रण निश्चितच बसू शकेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अफवांचा सोर्स शोधणे हे काम पोलिसांना करावे लागेल. सध्या सायबर यंत्रणा अतिशय अत्याधुनिक पद्धतीने कार्यरत असल्याने अशा अफवा पसरवणाऱ्या सोर्सपर्यंत पोहोचणे फारसे अवघड नाही. त्यामुळे जेव्हा अशा समाजघटकांचा शोध घेऊन त्यांना योग्य शासन केले जाईल तेव्हाच इतरांना त्यापासून योग्य धडा मिळू शकेल. जी गोष्ट अजिबात घडलेली नाही ती गोष्ट घडली असल्याचे भासवून ती व्हायरल करण्याची जी एक विकृत मानसिकता आहे त्याच प्रकारे समाजातील अनेक मान्यवर लोकांबाबत चुकीची माहिती पसरवून त्याबाबत गैरसमज निर्माण करणारे काही समाजकंटक आहेत त्यामुळे विनाकारणच सामाजिक परिस्थिती बिघडते.
मोठ्या राजकीय नेत्याचा एखाद्या मोठ्या गुंडासोबत चुकीचे छायाचित्र असो किंवा एखाद्या नेत्याने न केलेच विधान असो, या गोष्टी जेव्हा चुकीच्या अर्थाने प्रसारित केल्या जातात तेव्हा त्याचीही प्रतिक्रिया कोठे ना कोठे उमटत राहते. त्यामुळेही सामाजिक परिस्थिती बिघडण्याचा धोका जास्त असतो. काही वेळा अनेक वर्षांपूर्वीचे व्हिडिओज किंवा मेसेजेस पुन्हा पुन्हा आपल्या स्मार्टफोनवर येत राहतात, ज्याचा वर्तमानकाळात कोणताही संदर्भ नसतो किंवा त्या मेसेजला कोणताही अर्थ नसतो. उदाहरणार्थ, एखाद्या गरीब मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करणारा मेसेज किंवा व्हिडिओ अनेक वेळा आपल्या स्मार्ट फोनवर आलेला असतो. अशा व्हिडिओला किंवा मेसेजला जसा कोणताही अर्थ आणि संदर्भ नसतो तसाच अर्थ आपण शहानिशा न करता फॉरवर्ड केलेल्या मेसेजलाही नसतो.
स्मार्टफोनवरील समाजमाध्यमांच्या व्यासपीठावर येणारा प्रत्येक मजकूर खराच आहे या मानसिकतेतून बाहेर पडून हा मजकूर तपासण्याची सवय जोपर्यंत स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाला लागत नाही तोपर्यंत अफवांचा बाजार बंद पडणार नाही. साहजिकच एकाच वेळी सर्वसामान्य नागरिकांनी सावधपणे आपल्या स्मार्टफोनचा वापर करतानाच दुसरीकडे पोलीस यंत्रणांनी अफवा पसरविणाऱ्या समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्याचेही काम करायला हवे तरच अफवांच्या या बाजारावर संपूर्ण नियंत्रण बसवणे शक्य होईल.