सांगली – मुलगी जन्मली की घरात लक्ष्मी आली असे म्हटले जाते. मात्र पहिली मुलगी असताना दुसऱ्यांदाही मुलगीच जन्माला आली म्हणून पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना सागंली जिल्ह्यातील इस्लामपूरजवळील कापूसखेड हद्दीत घडली. विहिरीत ढकलून खून करण्यात आला. राजनंदिनी सरनोबत (वय 29) असे मृत्यू पावलेल्या विवाहितेचे नाव असून कौस्तुभ सरनोबत (वय 30) असे संशयीत आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
राजनंदिनी आणि कौस्तुभला एक सात वर्षांची मुलगी होती. त्यानंतर चार महिन्यांपूर्वीही मुलगी जन्मली. यामुळेच त्याने पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. दोघे पती-पत्नी कापूसखेड रोडला फिरायला गेले होते. यावेळी माॅर्निंग वाॅक करताना रस्त्यावरील हॅंग ओव्हर बारजवळ असणाऱ्या पाण्याने भरलेल्या विहिरीच्या कडेला नेवून तिला विहीरीत ढकलून दिल्याचे समोर आले आहे. विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून ही बाब समोर आली.
लघुशंकेसाठी पत्नी विहिरीजवळ गेली असता पाय घसरून ती विहिरीत पडली आणि मृत्यू झाला असे पती कौस्तुभने सांगितले होते. मात्र विवाहितेच्या आई-वडिल आणि भावाने कौस्तूभनेच तीचा खून केला असल्याची तक्रार इस्लामपूर पोलीसात दिली. दुसरीही मुलगीच झाल्यामुळे त्याने असे कृत्य केल्याचे म्हंटले आहे. त्यानंतर संशयीत आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.