मुंबई – आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघाला अपयश आल्यावर झालेल्या टीकेला उत्तर देताना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी टीकाकारांच्या वक्तव्यांबाबत नाराजी व्यक्त केली. एका स्पर्धेतून बाहेर पडलो म्हणजे आमच्या खेळाडूंचा दर्जा खालावला असे म्हणणे योग्य नाही, असे द्रविड यांनी म्हटले आहे.
या स्पर्धेच्या साखळी फेरीत आम्ही चांगला खेळ केला. मात्र, सुपर फोर गटात आम्हाला अपयशाचा सामना करावा लागला. सलग दोन पराभव स्वीकारल्यामुळे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. खेळाडूंनी सरस कामगिरी करण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. कोणत्याही सामन्यात यश अपयश येत असते, परंतु लगेचच खेळाडूंवर अविश्वास दाखवणे गैर आहे. या गटात आम्ही दोन सामने हरलो म्हणून आम्ही दर्जाहीन ठरत नाही, असे ते म्हणाले.
टी-20 सामन्यांमध्ये जिंकण्यासाठी अंतर खूप कमी असते. एखादे अचूक षटक किंवा एखादे महागडे षटक संपूर्ण सामन्याचा निकालही फिरवू शकते. पाकिस्तान व श्रीलंकेविरुद्धचे सामने जिंकणे निश्चितच गरजेचे होते. मात्र, या पराभवातून खेळाडू खूप काही शिकले आहेत. गेल्या आठ ते नऊ महिन्यांत आम्ही चांगले क्रिकेट खेळलो आहे, असे ते म्हणाले.
भारतीय संघाने 2016 व 2018 या दोन्ही वर्षी आशिया करंडक जिंकला होता. त्यामुळे यंदाही भारतीय संघाकडून विजेतेपदाच्याच अपेक्षा होत्या. मात्र, भारताला यंदा विजेतेपद राखता आले नाही. सुपर फोर गटातील दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर भारताला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.