ओव्हल -भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील संघ निवडीवर भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी टीका केली आहे. रवीचंद्रन अश्विनपेक्षा रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना रवींद्र जडेजा असा इतका उपयुक्त कसा वाटला, असा प्रश्न गांगुली यांनी उपस्थित केला आहे.
या खेळपट्टीवरील गवत नाणेफेक होण्यापूर्वीच काढून टाकले गेले होते. सकाळच्या थंड वातावरणाचा लाभ सुरुवातीच्याच षटकात होणार होता व नंतर ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला साथ देइल हे स्पष्ट दिसत होते. त्यातही ऑस्ट्रेलियाच्या संघात पाच डावखउरे फलंदाज असतानाही अश्विनच्या जागी जडेजाला अंतिम संघात कसे घेतले गेले याचेही मला आश्चर्य वाटले, असेही गांगुली म्हणाले.
भारतीय फलंदाजी सुरु झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पीन गोलंदाज नाथन लॉयन याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली व फलंदाजांना जखडून ठेवले तेच काम अश्विनने केले असते. मुळातच ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ऑफ स्पीन गोलंदाजीसमोर फारसे चांगले खेळत नाहीत, असे असूनही अश्विनला का वगळले गेले, असा प्रश्नही त्यांनी विचारला.