कोलकाता – विराट कोहली व माझ्यात बेबनाव आहे अशा बातम्या केवळ खोडसाळपणानेच पसरवल्या जात आहेत, असा खुलासा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केला आहे. कोहलीने आशिया करंडक स्पर्धेत शतक फटकावताना गेल्या तीन वर्षांचे अपयश पुसून काढले त्यावर बोलताना गांगुली यांनी कोहलीचे कौतुक केले. मात्र, याचवेळी कोहलीशी बेबनाव असल्याच्या प्रश्नावर त्यांनी हा टोला लगावला आहे.
माझे कोहलीशी फारसे बोलणे होत नाही, कारण तो संघासह सातत्याने सामन्यांसाठी स्पर्धांसाठी प्रवास करत असतो. मात्र, जेव्हा तो भेटतो त्यावेळी सगळ्याच विषयांवर चर्चा होते. माझ्याशी त्याचा कोणताही वाद नाही, गैरसमजही नाहीत. मात्र, असे वृत्त देत माध्यमेच खोडसाळपणा करतात, असे गांगुली यांनी म्हटले आहे.
बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून तसेच एक माजी कसोटी क्रिकेटपटू व माजी कर्णधार म्हणून मी सातत्याने खेळाडूंच्या हिताचेच निर्णय घेत असतो. पूर्वग्रह धूषित ठेवून बीसीसीआय सांभाळणे कठीण आहे. मुळातच कोहली एक महान खेळाडू आहे व त्याला कोणत्याही गोष्टींसाठी माझी मदत होत असेल तर ती करायला मी कायम सज्ज आहे. मात्र, आमच्यात कोणतेही मतभेद नाही व बेबनावही नाही, असेही गांगुली यांनी सांगितले.
आशिया करंडक स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्धच्या सुपर फोर गटातील सामन्यात कोहलीने 71 वे आंतरराष्ट्रीय शतक फटकावल्यामुळे भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. कोहलीसारखा फलंदाज भरात असणे अतिशय महत्त्वाचे आहे, असेही गांगुली यांनी म्हटले आहे.
सूर गवसला हे उत्तम
आशिया करंडक स्पर्धेत सुमार कामगिरी झाल्यामुळे भारतीय संघाचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. मात्र, वाईटातूनही चांगले शोधले तर कोहलीला त्याला फॉर्म परत मिळाला ही सर्वात चांगली गोष्टी ठरली. येत्या काळात मायदेशात ऑस्ट्रेलिया तसेच दक्षिण आफ्रिका संघांशी भारतीय संघाला मालिका खेळायची आहे तसेच ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. त्यासाठी कोहलीचे भरात येणे संघासाठी अत्यंत महत्त्वाचे होते व तेच घडले, असेही गांगुली म्हणाले.