मुंबई – भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व नवोदित स्टार गोलंदाज हर्षल पटेल दुखापतीतून सावरत असून लवकरच भारतीय संघात परततील असा विश्वास राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) सुत्रांनी व्यक्त केला आहे.
बुमराह व पटेल या दोघांनाही पाठीच्या दुखापतीमुळे येत्या शनिवारपासून सुरु होत असलेल्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. त्यापूर्वीही त्यांना झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेलाही मुकावे लागले. मात्र, आता अकादमीत ते तंदुरुस्तीचे व्यायाम तसेच हलका गोलंदाजीचा सराव करत असून लवकरच भारतीय संघात थाटात पुनरागमन करतील असा विश्वास या सुत्रांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आशिया करंडक स्पर्धा येत्या शनिवारपासून सुरु होत आहे. स्पर्धेच्या सलामीचा सामना शनिवारी श्रीलंका व अफगाणिस्तानमध्ये होणार आहे. तर, रविवारी भारत व पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज लढत होणार आहे.
यंदाची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. स्पर्धेत भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे.