जीवनात प्रत्येकालाच ज्याच्या त्याच्या स्थितीप्रमाणे जे आणि जसं जीवन लाभलं आहे ते जगत असताना, जे आहे त्यात सुख मानत आणि नाही त्याची उगीच खंत करीत, रडत न बसता हसत आणि इतरांना हसवत कसं जगायचं आणि प्राप्त जीवनाचा कसा आनंद घ्यायचा, हे नेमकेपणाने कळण्यासाठी आधी आपण नेमकं काय सोडायचं आणि काय धरायचं हे समजून घ्यावे लागते.
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ही सोडण्याची आणि धरण्याची प्रक्रिया घडतच असते. फक्त ती त्या त्या वेळी योग्य पद्धतीने आणि योग्य तशी घडायला हवी इतकेच. उदा. बाल आणि कुमार वयात चांगले आचार, विचार, संस्कार, खरे बोलणे, आज्ञापालन यासारख्या गोष्टी या जोडायच्या असतात. तर वाईट सवयी, आळस, अभ्यास न करणे, व्यायाम न करणे, मोठ्यांचा आदर न करणे या सारख्या गोष्टी प्रयत्नपूर्वक दूर कराव्या लागतात. कारण, जीवनाला नीटनेटका आकार देण्याचं तेच वय असत.
तारुण्यातही चांगल्या मित्रांची संगत, कष्ट, मेहनत, सचोटी, प्रामाणिकपणा, सदाचार, सद्वर्तन यासारख्या गोष्टी जोडाव्या आणि त्या जपाव्याही लागतात. तर दुराचार, स्वैराचार, उद्धट वर्तन, व्यसनाधीनता, अनादर, उर्मटपणा, माझंच खरं हा आग्रह या गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळाव्या लागतात. त्यापासून चार हात दूरच राहावे लागते. म्हातारपणात जिभेवर ताबा राहात नाही. ती पदोपदी आवरावी लागते. नाहीतर ती आपले आरोग्य जशी बिघडवते तसेच नातेसंबंधही. या वयात गुंतूून न पडण्याची कला जोडून घ्यावी लागते. गोष्टींनी आपले मानसिक वा शारीरिक आरोग्य बिघडेल अशा गोष्टी सोडाव्या लागतात.
आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यावर प्रपंच्यात अडकून न पडता तेथील माया, मोह, ममतेच्या गुंत्यातून स्वत:ची सोडवणूक करून घावी लागते. आपल्या जन्माचे कल्याण होईल, आपले जीवन हे केवळ कष्टच करा, असे होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी जे सोडायला हवं त्याची मानसिक तयारी करावी लागते. प्रपंच हा देहाने नाही तर तो मनाने सोडून परमार्थ, ईश्वर साधना या गोष्टी प्रयत्न पूर्वक जोडाव्या लागतात.
अरुण गोखले