मुंबई – मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटवरून राजकीय वातावरण तापले असतानाच सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणातून एसीबीकडून देण्यात आलेल्या क्लीन चिटचा अहवाल अद्यापही उच्च न्यायालयाने स्वीकारला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने अजूनही हा रिपोर्ट प्रलंबित ठेवला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
याबाबत एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, हा अहवाल अजूनही न्यायालयाने स्वीकारलेला नाही आणि फेटाळला देखील नाही. मागील दोन वर्षांपासून हा अहवाल प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. अजित पवारांना 2019 साली सिंचन घोटाळ्यातून क्लीन चिट देण्यात आली होती.
परमबीर सिंह यांनी ही क्लीन चिट दिली होती. पण दोन वर्षांच्या काळात करोनाचा प्रादुर्भाव असल्याने हा अहवाल स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अजित पवार यांना पूर्णपणे या प्रकरणातून क्लीन चिट मिळाली नसून त्यांच्यावर अद्याप टांगती तलवार कायम असल्याचे बोलले जात आहे.