बार्सिलोना : मुलांचा घरापासून शाळेचा प्रवास ट्रॅफिक मधूनच होत असतो. अशावेळी जर ट्रॅफिकमध्ये गोंगाट आणि गोंधळ जास्त असेल तर त्यांच्या अभ्यासावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. मुलांचा अभ्यासावरील फोकस तब्बल 4.8 टक्क्याने कमी होत असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासात समोर आला आहे.
मुले घरातून शाळेकडे ज्या मार्गाने जातात त्या मार्गावर जर वाहतुकीचा गोंगाट जास्त असेल आणि त्यात सातत्य असेल तर त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीवर होतो. स्पेनमधील बार्सिलोना इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थ या संस्थेने देशातील 38 शाळांचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष जाहीर केला आहे. 6 ते दहा या वयोगटातील एकूण 2680 विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यात आला. वातावरणातील आवाजामध्ये पाच डेसिबलची वृद्धी झाली तरी विद्यार्थ्यांची स्मरणशक्तीवर 11 टक्के नकारात्मक परिणाम होतो असे या संशोधनातून समोर आले.
अवघड कामे करण्याच्या क्षमतेवरही या गोंगाटाचा परिणाम होतो. एकूणच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर फोकस करण्याच्या क्षमतेमध्ये 4.8% ने घट होण्याचा धोका निर्माण होतो. हे संशोधन करणारे डॉक्टर जोर्डी सेनवर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मुलांच्या आयुष्यातील शालेय कालावधी हा अतिशय महत्त्वाचा असतो. याच कालावधीमध्ये जर अशाप्रकारे गोंगाट आणि गोंधळ असा त्यांच्यावर परिणाम झाला तर दीर्घकाळ त्यांच्या आयुष्यावर हा परिणाम राहू शकतो.
ध्वनी प्रदूषण आणि इतर प्रकारचे प्रदूषण असणाऱ्या परिसरात ज्या शाळा आहेत. त्या परिसरात राहणाऱ्या किंवा या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्थूलत्वाचा धोकाही जास्त असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. विद्यार्थ्यांना शांतपणे शिक्षण घेणे शक्य आहे. अशाच प्रदेशांमध्ये आगामी कालावधीमध्ये शाळा सुरू कराव्यात अशी सूचना या अहवालात करण्यात आली आहे.