मुंबई – शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष पावसाळी अधिवेशनाकडे लागले आहे. शिंदे फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे या अधिवेशनात नवीन सरकार काय महत्वाचे निर्णय घेणार याची उत्सुकता सर्वसामान्यांना आहे. तत्पूर्वी शिवसेनेकडून शिंदे गटासह भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.
एक कार्यकर्ता शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेता, सर्वोच्च मंत्रीपदापर्यंत पोहोचला तो शिवसेनेमुळे. त्याच कार्यकर्त्याने बेइमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, पण शेवटी ती गुलामीच आहे. गुलामांना कधीच प्रतिष्ठा मिळत नाही. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हे दिसेल. राहिला विषय शिंदे गटाच्या बेइमान आमदार देत असलेल्या धमक्यांचा. हे धमकी बहाद्दर पादरे पावटे आहेत. असा हल्लाबोल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. पण या महोत्सवात महाराष्ट्राच्या वाट्याला अमृताचे दोन कण सोडाच. पण लाचारी आणि गुलामीच्याच बेड्या पडल्याचे दिसते. शिंदे गटाचे अस्वल झाले व दरवेशी श्री फडणवीस आहेत. एकंदरीत जे खातेवाटप वेगैरे झाले त्यातून स्पष्ट दिसते भाजपने फेकलेल्या तुकड्यांवर व खोक्यांवरच त्यांना यापुढे गुजराण करावी लागेल, अशा शब्दात सामनामधून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.