धुळे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बलशाली भारताच्या निर्मितीत समाजाच्या सर्व घटकांनी योगदान द्यावे. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून यंदाच्या खरीप हंगामात धुळे जिल्ह्यातील 44 हजार 865 शेतकऱ्यांना 512 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. आगामी रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वितरणाच्या सूचना बँकांना सहकार विभागाच्या माध्यमातून दिल्या आहेत, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आज सकाळी आयोजित करण्यात आला होता. मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी देशाचे संरक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर मंत्री भुसे यांनी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. यावेळी ध्वजारोहणाच्या मुख्य सोहळ्यावर जिल्हा प्रशासन व फ्लाइंग क्लबच्या सहकार्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाचे फुगे आकाशात सोडण्यात आले.
मंत्री भुसे म्हणाले, आजपासून बरोबर 75 वर्षांपूर्वी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होवून स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित झाले. त्यासाठी भारतीयांना दीडशे वर्षे ब्रिटिशांशी संघर्ष करावा लागला. या काळात विविध आंदोलने झाली. स्वातंत्र्याच्या या यज्ञात अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. शेवटी 1942 मध्ये ब्रिटिशांना ‘चले जाव’ करावे लागले. त्यानंतर 1947 मध्ये आजच्याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला मिळालेले स्वातंत्र्य केवळ भारतासाठी नव्हते, तर तिसऱ्या जगातील पारतंत्र्यातील सर्व देशांसाठी प्रेरणा देणारे होते.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक ज्ञात- अज्ञात वीरांनी योगदान दिले आहे. धुळे जिल्हाही स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्यात मागे नव्हता. जिल्ह्यातील चिमठाणे गावाजवळ क्रांतिकारकांनी ब्रिटिशांचा खजिना लुटला होता. जंगल सत्याग्रह, विविध आंदोलनाच्या माध्यमातून या स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांना जेरीस आणले होते. धुळे जिल्हा कारागृहात आचार्य विनोबा भावे, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी, पूज्य सानेगुरुजी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना बंदिवान करण्यात आले होते. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच गोवा मुक्ती संग्रामातही आपल्या जिल्ह्याने योगदान दिले आहे.
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि राज्य शासनाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमास आपल्या जिल्हावासीयांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्वच असा म्हणावा लागेल. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचे स्मरण होण्याबरोबरच आपला देशाभिमानही वाढला आहे.
जिल्ह्यात 75 अमृत सरोवर
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धुळे जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात येणार आहे. आतापर्यंत 20 सरोवरांचे काम पूर्णत्वास आले असून उर्वरित सरोवरांचे काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय लाभार्थ्यांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनतेला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रति व्यक्ती पाच किलो धान्य माहे सप्टेंबर 2022 अखेर मंजूर केले आहे. त्यानुसार दरमहा नियमित व मोफत धान्याचे वितरण करण्यात येत आहे. दरमहा एकूण 14 हजार 500 टन अन्नधान्याचे पात्र लाभार्थ्यांना वितरण करण्यात येत आहे. तसेच शिवभोजन योजनेचे 31 केंद्र सुरू आहेत. त्या माध्यमातून रोज सरासरी 2 हजार 800 थाळ्यांचे वितरण होत आहे. आतापर्यंत 15 लाख 10 हजारांपेक्षा जास्त गरजूंनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
कोविड प्रतिबंधक लस घ्या…
गेली दोन वर्षे कोरोना विषाणूने आपल्याला बंदिस्त करून ठेवले होते. मात्र, कोविड लसीकरणाने त्याची तीव्रता कमी केली. त्यामुळेच आज आपण मोकळा श्वास घेवू शकत आहोत. मात्र, आजही अनेकांनी पहिला, दुसरा किंवा बूस्टर डोस घेतलेला नाही. त्यांनी कोविड लसीकरण करून घेत सुरक्षित व्हावे. केंद्र सरकारतर्फे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 दिवस मोफत बूस्टर डोस देण्यात येत आहेत. त्याचाही लाभ पात्र नागरिकांनी घ्यावा.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर…
यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीआरएफ च्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात ई-पीक पाहणी कार्यक्रम सुरू केला आहे. ई-पीक पाहणीच्या सुलभीकरणासाठी शासनामार्फत नवीन ॲप व्हर्जन-2 विकसित केले आहे. या नवीन प्रणालीत सहभागी होवून शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी कार्यक्रमात सहभागी व्हावे. लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनीदेखील या प्रक्रियेत सहभाग नोंदवून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असेही आवाहन मंत्री भुसे यांनी केले.
जिल्ह्यात 16 हजार घरकुलांना मंजुरी
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत सन 2021- 22 या आर्थिक वर्षांत 16 हजार 15 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. यात धुळे जिल्ह्याने नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सन 2016- 17 ते 2021- 22 अखेर 40 हजार 939 घरकूल पूर्ण करण्यात आले आहे. शबरी आवास योजनेंतर्गत सन 2021- 22 मध्ये 1490 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. रमाई ग्रामीण आवास योजनेंतर्ग तीन हजार घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून 1 हजार 918 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.
पायाभूत सोयीसुविधांच्या निर्मितीवर भर
धुळे जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, दळण- वळण, औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजना 2022- 23 मध्ये सर्वसाधारणसाठी 236 कोटी रुपये, आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 118 कोटी रुपये, तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 30 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. या माध्यमातून पायाभूत सोयीसुविधा बळकटीकरणार भर देण्यात येत आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीतील विद्यमान मतदारांच्या प्रमाणिकरणासाठी आधार क्रमांकासह माहिती संग्रहित करण्याची मोहीम एक ऑगस्ट 2022 पासून सुरू केली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आधार क्रमांक हे बीएलओंमार्फत ऑनलाईन ॲपद्वारे आधार लिंक करण्याची मोहीम सुरु केलेली आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभाग नोंदवावा. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मात्र, त्यासाठी आपल्या सहकार्याचीही गरज आहे. आपण, सर्वजण वेळोवेळी सहकार्य करीत आले आहेत. यापुढेही करावे, असेही आवाहन मंत्री भुसे यांनी केले.