मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर अजित पवार यांनी राज्याच्या प्रश्नांवर माध्यमांशी संवाद साधला.
राज्यातील शिंदे सरकार हे जोवर 145 आमदारांचा पाठिंबा आहे तोवर चालेल, ज्यावेळी सरकारमधील आमदारांची संख्या कमी होईल तेव्हा हे सरकार गडगडेल, असे मत अजित पवार यांनी माध्यमांसमोर मांडले. सत्ताधारी पक्ष राज्यात 48 खासदारांपैकी 47 खासदार निवडून आणण्याची वक्तव्ये करत आहेत. पण महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात एकाच पक्षाचे संपूर्ण खासदार कधीच निवडून आलेले नाहीत. त्यामुळे कोणीही कितीही वक्तव्ये केली तरी राज्यातील मतदार हा अत्यंत विचारी आहे हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. आगामी निवडणुकीत यासंबंधीचे चित्र मतदानानंतर स्पष्ट होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
घराणेशाहीच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, राजकीय जीवनात कर्तृत्वाला जास्त महत्त्व आहे. त्याला घराणेशाही म्हणणे चुकीचे आहे. ज्यांच्यामध्ये कुवत नाही, ताकद नाही, कर्तृत्व नाही, अशांना बळजबरीने एखाद्या पदावर बसवले तर त्याला घराणेशाही म्हणू शकतो. मात्र राजकीय घरात जन्माला आलेली पुढची पिढी जर कर्तृत्ववान असेल आणि लोकशाही पद्धतीने जनतेने जर त्यांना आमदार अथवा खासदार केले तर त्याला घराणेशाही म्हणणे चुकीचे आहे असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारमधील खातेवाटपाच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. हे खातेवाटप करताना एखादे खाते हलके आणि जड असा भेद न करता महाराष्ट्रात काम करायचे असल्यास कोणत्याही खात्याच्या माध्यमातून काम करता येते. आम्हीदेखील सरकारमध्ये अनेक वर्षे काम केले आहे. काम करायचे म्हटले तर कोणतेही खाते स्वीकारून ते करता येते. फार वजनदार खाते एखाद्या कर्तृत्वशून्य व्यक्तीला दिले तर ती व्यक्ती कामाचा रिझल्ट देऊ शकत नाही. त्यामुळे खातेवाटपाबाबत कोणाला काय वाटते हा प्रत्येकाचा अधिकार आहे, असे अजित पवार म्हणाले.