सातारा – माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळात अनुभवाने आणि राजकारणातही समृद्ध असणाऱ्या अनेक ज्येष्ठ मंत्र्याबद्दल बेधडक विधाने करून त्यांची मने दुखावली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा ही त्यांची संपत्ती होती तो कुठेतरी संपत चालला होता. कॉंग्रेस- राष्ट्रवादीशी केलेली हातमिळवणी नैसर्गिक नव्हतीच. गेल्या अडीच वर्षात आदित्य ठाकरे यांनी पर्यटन क्षेत्रात काय केले हे त्यांनी सांगावे. पुढील अडीच वर्षात आम्ही त्यांच्या दुप्पट पर्यटनाच्या क्षेत्रातील कामे करून दाखवू. त्यांची विधाने आम्ही चॅलेंज म्हणून स्वीकारली आहेत, असा सडेतोड इशारा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेले दीपक केसरकर यांनी साताऱ्यात दिला.
शुक्रवारी सायंकाळी पुण्यावरून सावंतवाडीकडे रवाना होताना केसरकर साताऱ्यात थांबले आणि राजमाता कल्पनाराजे भोसले यांची जलमंदिरात भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना केसरकर म्हणाले, “आदरणीय राजमाता कल्पनाराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले महाराष्ट्राचे वैभव आहेत. सातारा जिल्ह्यातील पर्यटनाला प्रचंड वाव आहे.
कल्पनाराजे भोसले यांच्या कल्पनेतील शिवसृष्टी उभारणे हीसुद्धा एक ऐतिहासिक गोष्ट असून पर्यटन खात्याची जबाबदारी आली तर याविषयी निश्चितच विचार होईल. राजघराण्यातील परंपरा आणि त्यांच्या चालीरिती, त्यांचे जगणे याविषयीसुद्धा परदेशी पर्यटकांना प्रचंड आकर्षण असते. यांच्या गाठीभेटी अथवा सुसंवाद हासुद्धा पर्यटनाचा एक भाग आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगार घडवण्याची प्रचंड ताकद आहे. साताऱ्यात ही गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर असून येथील पर्यटनाचा विकास आणि त्यातील सुसंधी बारकाईने शोधण्याची गरज आहे.”