नवी दिल्ली – देशभरात 75 वर्षानिमित्त म्हणजेच स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण आहे. अशात देशाच्या सुरक्षेला धक्का पोहोचवणाऱ्या घातपाताचा कट उधळण्यात दिल्ली पोलिसांना मोठे यश आले आहे. देशाची राजधानी दिल्लीत 15 ऑगस्टपूर्वी तब्बल 2000 जिवंत काडतुसे सापडली आहेत. याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
पूर्व दिल्ली पोलिसांनी काडतुसे पुरवठादाराला आनंद विहार परिसरातून अटक केली आहे. सध्या आरोपी हा 2000 जिंवत काडतुसे कोणाला देणार होते. तसेच, याचा वापर कुठे केला जाणार होता. याबाबतची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण दिल्लीसह लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 15 ऑगस्टनिमित्त दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद विहार परिसरात दोन संशयितांकडे शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आनंद विहार परिसरात सापळा रचून संशयिताची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून 2000 जिवंत काडतुसे असलेल्या दोन पिशव्या जप्त केल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
यानंतर गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी संघटना दिल्लीत हल्ला करण्याचा कट रचू शकतात. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी गुप्तचर यंत्रणेने दिल्ली पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय, गुप्तचर यंत्रणेने 10 पानी अहवाल सादर केले आहे. त्या अहवालात गुप्तचर यंत्रणेने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा, जैश या दहशतवादी कटाची योजना आखत असल्याची माहिती दिली आहे.
आयएसआयला त्यांना लॉजिस्टिक मदत देऊन स्फोट घडवायचा आहे. अनेक नेत्यांसह बड्या संस्थांच्या इमारतींना लक्ष्य केले जाऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिननिमित्त कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येत आहे. तसेच 15 ऑगस्टला लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी 10 हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.