बिजवडी (ता. इंदापूर) :– पुणे, सोलापूर आणि अहमदनगरसह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने शंभरी पार केली. त्यामुळे शेतकरी, साखर कारखानदार आणि उद्योजकांमध्ये आनंदाचे, समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे आणि उजनी धरण साखळी क्षेत्रात सतत होत असलेल्या पावसाने भीमा खोऱ्यातील काही धरणांनी शंभरी पार केली, तर काही धरणे शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. या धरणातील पाण्याचा विसर्ग भीमा नदीतून होत असल्याने तो सरळ उजनीत येत आहे. त्यामुळे उजनी नेहमी प्रमाणेच यावर्षीही भीमा खोऱ्यातील पावसावर शंभरी पार करून पुढे गेले आहे. उजनी आज मितीस (शुक्रवारी) 103 टक्के भरले आहे.
काल (गुरूवारी) रात्री उजनीने शंभरी गाठल्यानंतर उजनीच्या सोळा दरवाजांमधून प्रथम दहा हजार क्यूसेकचा विसर्ग करण्यात आला. तो तसाच वाढवत गेल्याने आज सायंकाळीपर्यंत तो चाळीस हजार करण्यात आला आहे. पुणे परिसरातील पावसावर आधारीत विसर्ग करावा लागत आहे. जर पुण्यातून होणारा विसर्ग कमी झाला तर उजनीतीलही कमी होईल.
आता मात्र उजनीतील या विसर्गाने आणि नीरा नदीतील विसर्गाने भीमा नदी काठच्या लोकांना सावधानतेचा इशारा उजनी प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. नीरा नदीतील विसर्ग आणि उजनीतील विसर्ग यामुळे पंढरपूरमध्ये साधारण साठहजार क्यूसेक एवढा विसर्ग असेल. त्यामुळे नदीच्या पात्रात कोणीही जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये, असे प्रशासनाने म्हटले आहे.