नवी दिल्ली – शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सुरू असलेल्या वादावर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला चार आठवड्यांचा वेळ देण्यास नकार दिला आहे. तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी केवळ 15 दिवसांची मुदत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.
धनुष्यबाण कुणाचा यावर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटामध्ये वाद सुरू असून हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचला आहे. या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगोकडून चार आठवड्यांची मुदत मागितली होती. त्यावर निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला पूर्ण वेळ द्यायला नकार देत अवघ्या पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला 23 ऑगस्टपर्यंत आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. त्या आधी राज्यातील सत्तासंघर्षावर 22 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ निवडणूक आयोगातही उद्धव ठाकरे गटाचे टेन्शन वाढणार असल्याचे चित्र आहे.