सातारा – जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जावळी तालुक्यातील खिरखंडी गावास भेट दिली. तेथील कुटुंबांशी संवाद साधून विद्यार्थ्यांची बामणोली आश्रमात सर्व सोय करण्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रशासनाची विनंती या कुटुंबांनी मान्य केल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय आता दूर होणार आहे.
मौजे खिरखंडी हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील असून या गावामध्ये पूर्वी एकूण 70 कुटुंबे वास्तव्यास होती. कोयना धरणाच्या निर्मितीमुळे या गावाचे मौजे एकसाल सागाव (ता . भिवंडी, जि. ठाणे) या गावामध्ये पुनर्वसन झाले. तथापि, पुनर्वसन झाल्यानंतरही 70 कुटुंबांपैकी 6 कुटुंबांनी पुनर्वसन झालेल्या गावातील जमीन ताब्यात घेतली नाही. तर एका कुटुंबाने पुनर्वसनाच्या ठिकाणची जमीन ताब्यात घेतली आहे. परंतु, त्या कुटुंबातील काही व्यक्ती खिरखंडी येथेच वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत एकूण 7 कुटुंबे पुनर्वसन झालेल्या गावांमध्ये स्थलांतरित न होता ती खिरखंडी येथेच वास्तव्यास आहेत.
खिरखंडी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंत शाळा असून सद्यस्थितीत या गावातील 10 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. दोन विद्यार्थी गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत असून उर्वरित 8 विद्यार्थी खिरखंडी ते शेंबडी असा प्रवास लॉंचने करतात. या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्याजाण्यासाठी पूर्वीपासूनच जिल्हा परिषदेच्या लॉंचची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यार्थ्याचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी लॉंचमधून प्रवास करताना त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक साधने प्रशासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. तथापि, लॉंचच्या वेळापत्रकानुसार काही दिवशी या विद्यार्थ्यांना लॉंचची सेवा उपलब्ध होत नाही.
परंतु, प्रशासनामार्फत लॉंचच्या वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही प्रशासनातर्फे देण्यात आली. लॉंचमधील प्रवासानंतर या ठिकाणी वर्गीकृत रस्ता उपलब्ध नसल्याने विद्यार्थी शेंबडी ते अंधारी असा एकूण 4 किलोमीटरचा पायी प्रवास अवर्गीकृत पाऊलवाटेने करुन अंधारी येथे शिक्षणासाठी जात आहेत.
खिरखंडी येथील विद्यार्थ्यांची शिक्षणाची व राहण्याची सोय मौजे अंधारी येथील आश्रमशाळेमध्ये करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत होते. परंतू सद्यस्थितीत या विद्यार्थ्याचे पालक त्यासाठी सहमत नव्हते. प्रशासनामार्फत या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवृत्त करण्याचे प्रयत्न सुरु होते. जेणेकरुन या विद्यार्थ्यांना लॉंचने अथवा पायी प्रवास करावा लागणार नाही. या प्रयत्नांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांशी विद्यार्थ्यांबाबत आणि पुनर्वसनाबाबत चर्चा केली. या प्रयत्नांना यश आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
दोन किलोमीटरचा केला पायी प्रवास
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, उपवनसंरक्षक, शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह बुधवारी खिरखंडी गावास भेट दिली. शेंबडी मठापासून लॉंचने प्रवास केल्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन किलोमीटर पायी चालत खिरखंडी गाठली. स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. तीनच दिवसापूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपली संवेदनशीलता दाखवून दिली आहे.