सातारा -किल्ले अजिंक्यताऱ्यावरील मंगळाईदेवी परिसर ते किल्याच्या पूर्व भागाकडील खालची मंगळाई या हवाई मार्गावर रोप- वे उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. डबल केबलव्दारे या दोन्ही ठिकाणांचे परिसरात एकाच वेळी दोन्ही बाजूंकडून आठ आसन क्षमतेच्या दोन रोप- वे ट्रॉलीचे आगमन- निगमन होणार आहे. त्याकरीता आवश्यक जागा उपलब्ध होत आहे. एकूण 92 कोटी रुपयांच्या या केबल रोप- वे प्रकल्पाची उभारणी केंद्राच्या निधीमधून करण्यात येईल, अशी ग्वाही भूपृष्ठ व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिलीे. लवकरच केंद्राच्या निधीतून नगरपरिषदेमार्फत अजिंक्यतारा येथील रोप- वेच्या उभारणीस सुरुवात होईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
नवी दिल्लीत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज ना. नितिन गडकरी यांची भेट घेतली. केंद्राच्या माध्यमातून अजिंक्यतारा येथे उभारण्यात येणाऱ्या रोप- वेबाबत विस्तृत चर्चा केली. त्याप्रसंगी गडकरी यांनी ही ग्वाही दिली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले की, किल्ले अजिंक्यतारयाला मोठा इतिहास लाभला आहे. याच किल्यावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही काळ वास्तव्य होते. या किल्यावर सुमारे सात तळी असून या तळ्यातील झऱ्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न पर्यावरण आणि इतिहासप्रेमींच्या मदतीने केला जाणार आहे. किल्यावरील राजसदरेचा चौथरा अद्यापही मजबूत आहे. तसेच किल्यावर श्री मंगळाईदेवी मंदिर आणि दक्षिणाभिमुखी मारुतीचे मंदिर अनेक भाविकांचे श्रध्दास्थान आहे. किल्याच्या भक्कम अशा प्रवेशव्दारापासून पायऱ्यांचा भाग तसेच तेथील बुरुज प्रेक्षणीय आहे. सुमारे 70 एकरांपेक्षा जास्त भूभाग किल्याला लाभला असून बहुतांशी भाग सपाट आहे.
अनेक स्थित्यंतर पाहिलेल्या आणि इतिहासाचा साक्षीदार असलेल्या अजिंक्यतारा किल्याचा सातारकरांचा अभिमान आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी रायगडावरुन स्वराज्याची राजधानी किल्ले अजिंक्यताऱ्यावरच स्थलांतरीत केली होती. जाज्वल्य इतिहास असलेल्या आणि ऐतिहासिक पाउलखुणा उमटलेल्या या किल्यावर आजही हजारो व्यक्ती, इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि भाविक नेहमीच भेट देत असतात. नवरात्रातील सर्व दिवसांत किल्यावरील मंगळाईचे दर्शनाला नेहमीच गर्दी होत असते. परगावचे अनेक पर्यटक अजिंक्यतारा किल्यास भेट देण्यास उत्सुक असतात. किल्याच्या दरवाजापासून थोडीशी चढण आणि पायऱ्या असल्याने वयस्कर नागरिकांना किल्ल्यावर जाता येत नाही. केबल रोप- वेमुळे सर्वांना कमी वेळेत आणि कमी श्रमामध्ये किल्यावर जाता व येता येणार आहे. इतिहास तज्ज्ञांशी विचार करुन या किल्यावर ऐतिहासिक पर्यटन सुरु करण्याच्या कार्याला रोप- वेमुळे मदत व गती मिळणार आहे.