नवी दिल्ली :- वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका शुक्रवार( दि. 29 जुलै) पासून सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर केएल राहुलला करोनाची लागण झाली असल्याने तो मालिकेतून बाहेर पडला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
गेल्या आठवड्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मुंबईतील बोर्डाच्या बैठकीनंतर राहुल कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. राहुलने आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे; परंतु डॉक्टरांनी त्याला आणखी एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो वेस्ट इंडिजला रवाना होऊ शकलेला नाही.
दरम्यान, जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेच्या पूर्वसंध्येला राहुल जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दुखापतीतून बरे होत असतानाच त्याला करोनाची लागण झाल्याचे त्याचे पुनरागमन पुन्हा लांबले आहे.