नेवासा – चालत्या गाडीत दाम्पत्याने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नगर – औरंगाबाद महामार्गावरील बाभुळवेढे शिवारात शनि चौथऱ्याजवळ घडली. या घटनेत पती आणि पत्नी दोघेही गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे एक जोडपे आपल्या चार चाकीतून औरंगाबादहून – पुण्याकडे चालले होते. यावेळी त्यांचे गाडीत काही कारणामुळे कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात पतीने गाडीतच पेटवून घेतले. दरम्यान या घटनेत पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या घटनेत कार अक्षरश: जळून खाक झाली आहे. याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल नसल्याने घटनेचा खरा उलगडा झाला नाही. या प्रकरणी अधिक तपास नेवासा पोलिस करत आहेत.