घरच्या सान्यांनी मला ‘घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणारा मी’ असंच ठरवलं होतं. वय तरुण होतं काही तरी सतत आपल्याकडून समाजासाठी करीत राहावे ही जिद्द. वडील म्हणत ‘याचं काहीच ठरत नाही.’ बहीण म्हणायची दादा, आता तू मोठा झालायस रे जरा घरात लक्ष घाल ना. बाबा, तुझ्या काळजीने थकत चाललेत रे. आता तूच त्यांचा आधार आहेस.’ मात्र, आई म्हणायची ‘बाळा, मनाचा कौल घे. जोवर तुझ्या हातून काही तरी चांगलं घडत नाही समाजासाठी तोवर मनात हृदयातला राम तुझ्या पाठीशी आहे बघ.
विवेक बुद्धीचा कौल घेऊन काम करीत राहा. सद्सद्विवेक जागा ठेव.’ वडील म्हणत, “बघ बघ तायडे आपण चांगलं सांगतोय तुझ्या दादाला. त्याच्याच हिताचं ना? पण आमच्या यांच्या तुझ्या आईच्या सल्ल्यानं हा तुझा दादा वागतोय. आगदी घरदार सारं सारं विसरून गेलाय. कसं व्हायचं उद्या ह्याचं?’
आज वयाची सत्तरी ओलांडलेला हा माझा मित्र एकेकाळी त्याच्या घरात घडणाऱ्या घटना, प्रसंग, वादविवाद आणि संवाद एक पात्री नाटकातल्या सारखा हावभाव करून सांगत होता. हे कुटुंब आणि आम्ही एकाच चाळीत राहणारे सारे. बेताच्याच आर्थिक परिस्थितीतले. मात्र, दुर्कीन संसार करणारी आम्ही सारी मंडळी एकमेकांशी नातेवाईकांपेक्षा घट्ट विणीने जोडले गेलो होतो. चाळीतल्या गणपती उत्सवात या मित्राचा पुढाकार, दहीहंडी असो, रंगपंचमी असो, होळी असो हाच सान यांचा दादा होता. चाळीतल्या कुठल्याही घरातले दुःख असो संकट असो हा मदतीला सर्वात पुढे असे. काळ सरकत पुढे गेला आम्ही सारे कुठे कुठे पांगलो नोकरी व्यवसायानिमित्त. आता संपर्क ही संपला.
एक दिवस वृत्तपत्रात भली मोठी बातमी वाचली. या माझ्या मित्राचा सत्कार मानपत्र असा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच त्या शहरातल्या लोकांनी भला मोठा निधी देण्याचे योजले होते. वर्तमानपत्र बाजूला ठेवताना एक मन म्हणाले हा दादा- आपला मित्र केवढा मोठा झालाय. खरंच तो आपल्याला ओळखेल तरी का? खरंच माणसाचा स्वभाव किती किती बदलतो नाही?
संध्याकाळी नेहमीप्रमाणे आम्ही सारे ज्येष्ठ कट्यावर जमलो. शेजारी बसलेले गृहस्थ या माझ्या मित्राच्या कार्याचे भरभरून कौतुक करीत होते. त्याने चालवलेले निराधार अपंगासाठाचे आश्रम, वृद्धाश्रम काय, गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह काय काय काय सांगत होते या माझ्या मित्राच्या कार्याबद्दल. त्यांच्याकडून कळाले म्हणे या माझ्या मित्राचे आई-वडील, बहीण सारे एका अपघातात गेले. उरला हा एकटाच. मोठं पद, मोठा पगार असणारा हा मात्र अविवाहित राहून समाजकार्यासाठी सारे सोडून समाजसेवक बनला. खरं तर हे सारे मला नवीनच कळाले होतो.
ऐकणारा मी भारावून गेलो होतो. कणभर असूयेनेही डंख मारला. त्या पाठी अहं ही डोकावला; पण क्षणभरच कारण मी तर सामान्य माणूस ना? शेजारी बसलेले म्हणाले, काय मग येताय माझ्या बरोबर? मी मात्र बघू या कसं जमतंय, म्हणून बोळवण केली.
मात्र, दुसऱ्या दिवशी हा माझा मित्र दारात हजर, त्याने मला सक्तीने आपल्या बरोबर त्या गावी नेले. छान भव्य कार्यक्रम झाला. त्याची योग्यता कळाली. माझा मित्र म्हणून अभिमानाने फुलारले. त्याच्या घरी गेल्यावर आमची आठवणींची मैफील बराच वेळ छान रंगली. त्याचे बुड काही घरात ठरत नाहीये आणि त्यांनतरचे घरच्यांचे संवाद त्याने छान सभिनय सादर केले. त्यांच्या लष्कराच्या भाकरीत मी छान रमलो. त्यांच्या घरून निघताना पाहिले त्यांचे डोळे ओलावले होते. त्याने मला घट्ट मिठी मारली. मलाही आनंदाश्रू अनावर झाले होते.
महादेव साने