तेलंगणा या दक्षिणेकडील छोट्याशा पण महत्त्वाच्या राज्यात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. गेल्या काही महिन्यांत भारतीय जनता पक्ष या राज्यात तेलगू देसम पार्टीच्या पिछेहाटीमुळे निर्माण झालेली पोकळी व्यापण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे; परंतु या स्वप्नांना खिळ बसण्याची चिन्हे आहेत. याचे कारण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी शर्मिला यांनी तेथे स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. तेलंगणात आजघडीला रेड्डी समाजाचा एकही नेता नाही. ही उणीव भरून काढण्याचे काम शर्मिला करू शकतात.
तेलंगणा हे महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य. तिथे आता एक वादळ निर्माण झालेले आहे. गेल्या आठवड्यात भाजपची कार्यकारणीची बैठक हैद्राबादमध्ये झाली. ती जाणीवपूर्वक तिथे घेण्यात आली होती. कारण भाजपचा तेलगंणामध्ये वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पंतप्रधान मोदी यांची तिथे जाहीर सभा झाली. गृहमंत्री अमित शाह यांचेही भाषण झाले. सत्ता काबीज करेल एवढे भाजपाचे अजून तिथे वादळ निर्माण झालेले नाही. कारण दक्षिण भारताचे राजकारणच फार वेगळे आहे.
दक्षिण भारत म्हणजे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. या सगळ्या राज्यांतील राजकारण प्रादेशिक पक्षांनी व्यापलेले आहे. उत्तर, पश्चिम आणि पूर्व भारतामध्ये प्रादेशिक पक्ष तेवढे प्रभावी नाहीत किंवा संख्येने कमी आहेत. परंतु दक्षिण भारतामध्ये 15 राजकीय प्रादेशिक पक्ष आहेत. भाजपाला त्या सगळ्या राजकीय प्रादेशिक पक्षांच्या राजकारणावर वर्चस्व निर्माण करायचे आहे. दक्षिण भारतात हिंदुत्वाचा नारा फारचा परिणामकारक ठरत नाही, असा अनुभव आहे. ती भाजपाची अडचण आहे. भाजपाने कर्नाटकमध्ये वर्चस्व निर्माण केलेले आहे. परंतु याचे खरे कारण आहे तिथे मिळालेला जननेता. भाजपाला येडीयुरप्पा यांच्या रुपाने लिंगायत समाजावर वर्चस्व असलेला एक “मास लिडर’ मिळालेला होता. म्हणून कर्नाटकात भाजपाला यश मिळाले. दक्षिण भारतातल्या इतर कोणत्याही राज्यामध्ये एखाद्या जातीवर पूर्णपणे वर्चस्व असेल असा मास लिडर भाजपाकडे नाही. ती भाजपची अडचण आहे. म्हणूनच भाजपाला दक्षिण भारतात फार प्रभावशाली पक्ष म्हणता येत नाही.
असो, तेलंगणामध्ये सध्या आलेले वादळ हे बहिण-भावाच्या भांडणाचे आहे. यातील बहीण आहे वायएसआर शर्मिला आणि भाऊ आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी. या दोघांच्यात सध्या जोरदार संघर्ष चाललेला आहे. जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशमध्ये विभाजन होण्यापूर्वी आपल्या पक्षाचे जबरदस्त वर्चस्व निर्माण केलेले आहे. ते वर्चस्व त्यांनी वडिलांच्या पुण्याईवर निर्माण केलेले आहे. जगनमोहन रेड्डी यांनी 2018 साली 175 पैकी 120 जागा मिळवून विधानसभेची निवडणूक जिंकली. आंध्रात अतिशय वर्चस्व असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टीला फक्त 23 जागा मिळाल्या होत्या. आज तेलगंणा म्हणून अस्तित्वात असलेला भागही त्यावेळी आंध्रचा घटक होता आणि तिथेही तेलगू देसम पार्टीचे वर्चस्व आता संपुष्टात आले आहे. कारण 2018 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तेलंगणामध्ये तेलगू देसम पार्टीचे फक्त दोन आमदार निवडून आले होते, पण आज ते दोघेही सत्ताधारी टीआरएस पार्टीत आहेत.
जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वायएसआर राजशेखर रेड्डी यांचा मुलगा. त्यांनी वडिलांच्या पुण्याईचा पुरेपूर वापर करत आंध्रात सत्ता मिळवली. आता त्यांची बहीण वायएसआर शर्मिला यांचे म्हणणे असे आहे की, आपण तेलंगणाच्या राजकारणातही उतरले पाहिजे. परंतु जगनमोहन रेड्डी यास तयार नाहीत. त्यावरुन या भावाबहिणीत वादळ निर्माण झाले आहे. शर्मिला यांनी तेलंगणामध्ये वायएसआर तेलंगणा नावाचा नवीन पक्ष स्थापन केलेला असून त्या तिथे जोरदारपणे कमबॅक करत आहेत. आठ जुलै रोजी त्यांनी या पक्षाची स्थापना केली. या पक्षामध्ये त्यांचा नवरा अनिल कुमारही आहे.
वायएसआर राजशेखर रेड्डी कुटुंब हे धर्माने ख्रिश्चन आहेत. अनिल कुमार हे लग्नापूर्वी ब्राह्मण होते; पण लग्नानंतर त्यांनीही ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. आता तो धर्म प्रचारक आहेत. राजकारणामध्ये त्यांचे वर्चस्व आहे. जगनमोहन रेड्डी यांना आंध्र प्रदेशात विधानसभेची निवडणूक लढवून देण्यामध्ये अनिल कुमार यांचा मोठा वाटा होता. आंध्र प्रदेशातील ओबीसी समुदाय नेहमी तेलगू देसम पार्टीच्या मागे होता. या समुदायाला वायएसआर कॉंग्रेसकडे वळवण्याचे काम अनिल कुमार यांनी केले होते. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी आपला मेव्हणा अनिल कुमार आणि बहीण शर्मिला यांच्याशी फारसे संबंध ठेवले नाहीत. त्यांना राजकारणात काही किंमत ठेवली नाही. त्यामुळे चिडलेल्या या पती-पत्नीने आता तेलंगणामध्ये वायएसआर नावाचा नवीन पक्ष काढला आहे.
जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षातही वायएसआर नाव आहे. कारण ते वडिलांचे नाव आहे. वायएसआर राजशेखर रेड्डी यांचे 2009 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यावेळेस त्यांच्या निधनाच्या धक्क्याने 1000 लोक मरण पावले होते. त्यातील काहींनी आत्महत्या केल्या होत्या, तर काही जण या निधनाचा धक्का पचवता न आल्याने ऍटकने गेले. इतके ते प्रभावशाली नेते होते. त्यामुळे त्यांच्या नावाचा वापर करून आपण पक्ष स्थापन केला पाहिजे, असे जगनमोहन यांना वाटले. वडिलांच्या निधनानंतर जगनमोहन यांना मुख्यमंत्री करायला कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तयार नव्हत्या. 2009 मध्ये वायएसआर यांचे निधन झाले त्यावेळी जगनमोहन यांनी आता मला मुख्यमंत्री केले पाहिजे अशी मागणी सोनिया यांच्याकडे केली होती. परंतु सोनियांच्या सल्लागारांनी जगनमोहन वयाने लहान असल्याने त्यांना मुख्यमंत्री करू नये, असा सल्ला दिला आणि सोनियांनीही त्यानुसार जगनमोहन यांना नकार दिला. यामुळे चिडून जाऊन जगनमोहन यांनी सोनियांच्या विरोधात बंड केले.
सध्या ईडी नावाचा प्रकार फार गाजतोय. भाजपा ईडीचा वापर आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर करत आहे, असा आरोप नेहमी होतो. परंतु कॉंग्रेसही ईडीचा वापर करत होती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जगनमोहन रेड्डी. त्यांच्याविरोधात ईडीचा वापर करून कॉंग्रेसने इतके त्रस्त केले की, ते बराच काळ जेलमध्येच होते. त्यांच्या कारावासाच्या काळामध्ये जगनमोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला यांनी पक्षाची सगळी सुत्रे सांभाळली होती. या दोघांची आई विजयाम्मा यांनीही तिथे खूप काम केलेले आहे. पतीच्या निधनानंतर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्या निवडून आल्या. लोकसभेलाही त्या उभ्या राहिल्या; पण विजयी होऊ शकल्या नाहीत. अर्थात, आजही त्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यावेळी पूर्ण पक्ष सांभाळणाऱ्या शर्मिला यांचे म्हणणे असे आहे की, जगनमोहन रेड्डी यांनी आपल्याला मदत करावी आणि तेलंगणामध्ये पक्ष स्थापन करावा. पण शर्मिलांनी जगनमोहन रेड्डी यांच्या इच्छेविरुद्ध जात नवा पक्ष स्थापन केला आहे. तेलंगणामध्ये तेलगू देसम पार्टी संपलेली आहे. कॉंग्रेसचे वर्चस्व संपत आलेले आहे. भाजपा म्हणावी तशी गती घेत नाही. सध्या तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांचा पक्ष सत्तेत आहे.
भाजपाला सध्या आपण तेलंगणामध्ये सत्ता मिळवू शकत नाही याची पूर्ण कल्पना आहे. तथापि, पश्चिम बंगालप्रमाणे त्यांना हवा निर्माण करायची आहे. तेलगू देसम पार्टी शून्यात गेल्यामुळे, कॉंग्रेसचे वर्चस्व कमी असल्यामुळे तिथे एक राजकीय पोकळी निर्माण झाली असून ती व्यापण्याचे काम शर्मिला करू शकतात. याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे तेलंगणाचे राजकारण केवळ तेलंगणापुरते मर्यादित नाही. संपूर्ण दक्षिण भारतामध्ये छोटे छोटे गट आहेत. त्यांची 8 ते 10 टक्के मते असतात. तेलंगणामध्ये वेल्लम जात जास्त वर्चस्व राखून असते. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव याच जातीचे आहेत. रेड्डी जातीला तिथे कोणी नेता राहिला नाहीये. रेड्डी म्हणजे गावचे पाटील असणारे मोठे जमिनदार. त्यांचे ग्रामीण भागामध्ये प्रचंड वर्चस्व असते.
तेलंगणात आजघडीला रेड्डी समाजाचा एकही नेता नाही. ही उणीव आणि तेलगू देसममुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम शर्मिला करू शकतात. आजवर असा जननेता नसल्यामुळे भाजपा तिथे मागे पडला होता; पण आता ही पोकळी शर्मिला भरून काढू शकतात. तेलंगणामध्ये 2023 साली होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत शर्मिला जबरदस्त वर्चस्व निर्माण करू शकतात. आजघडीला तेथे भाजपाची कितीही चर्चा होत असली तरी के. चंद्रशेखर राव यांना खऱ्या अर्थाने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आव्हान देण्याचे काम शर्मिलाच करणार आहेत.
बहिण-भावाच्या भांडणामध्ये विजयाम्मा यांनी आपले पुत्र जगनमोहन रेड्डी यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या बहिणीला तेलंगणामध्ये तू मदत करायला हवी, असा आग्रह त्यांनी धरला होता. परंतु जगनमोहन रेड्डी त्यांच्या काही अंतस्त राजकारणामुळे ते तेलगंणामध्ये हस्तक्षेप करायला तयार नाहीत. याची चिड येऊन विजयाम्मा यांनी जगनमोहन यांच्या वायएसआर कॉंग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्या आता तेलंगणामध्ये जाऊन मुलीसाठी प्रयत्न करत आहेत. एकूणच काय तर बहिण-भावाच्या राजकीय भांडणातून तेलंगणामधल्या राजकारणाची सगळी समीकरणे बदलणार आहेत. पुढील वर्षी तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या समीकरणांमध्ये कोण प्रभावी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
– अरविंद जोशी