नांदेड – शिंदे गट आणि भाजपा यांच्या युतीचे नवीन सरकार राज्यात स्थापन झाले आहे. मात्र, अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त लागलेला नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगाविला. तसेच राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीने थैमान घातलेले असताना मंत्रीमंडळच अस्तित्वात नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.
नांदेडमध्ये अतीवृष्टीग्रस्त भागाची जयंत पाटील यांनी पाहणी केली. यानंतर याच मुद्द्यावरून त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. जयंत पाटील म्हणाले, राज्यात पूरपरिस्थितीने जनता संकटात आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेऊन पंधरा दिवस झाले तर त्याआधीचे गुवाहाटीतील पंधरा दिवस असा महिना उलटला तरी अजून सरकार तयार झालेले नाही. कुणाला किती खाती द्यायची आणि कुणाचे किती मंत्री घ्यायचे? याच्यातच यांचा वेळ जात आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
राष्ट्रपती निवडणुकीतही ऑपरेशन कमळ; यशवंत सिन्हा यांचा आरोप
तसेच नांदेडमधल्या वसमत परिसरात ढगफुटी झाल्याने नदीचे पाणी नदीपात्रातून गावांमध्ये शिरले आहे. यामध्ये निळा, आलेगाव, एकदरा या गावांना पाण्याने वेढा घातला असून ऊस, सोयाबीनची पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने यात तत्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांसाठी जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.