श्रीनगर – सरकार जोपर्यंत काश्मीर खोऱ्यातील लोकांची मने जिंकत नाही आणि पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढत नाही तोपर्यंत काश्मीरमधील दहशतवाद संपणार नाही, असे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. परवाच एका पोलीस अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी हत्या करण्याचा प्रकार काश्मीरात घडला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना फारूख अब्दुल्ला बोलत होते.
काश्मिरातील दहशतवाद संपल्याचा दावा भाजपचे लोक करीत आहेत, परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत तुम्ही काश्मीरमधील लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत नाही आणि आमच्या शेजारी देशाशी बोलून त्यावर तोडगा काढत नाही तोपर्यंत हे संपणार नाही असे फारूख अब्दुल्ला यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
खासदार अब्दुल्ला यांनी शहरातील लाल बाजार परिसरात झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुश्ताक अहमद यांच्या हत्येचा निषेध केला.अहमद यांचा मुलगा 2020 मध्ये झालेल्या चकमकीत लष्कराकडून मारला गेला. आणि आज त्याच्या वडिलांची अतिरेक्यांनी हत्या केली हे दुर्दैवी आहे.
मारेकरी कोण आणि इथल्या लोकांचे तारणहार कोण, हेच आता कळेनासे झाले आहे अशी उद्विग्न प्रतिक्रियाही फारूख अब्दुल्ल यांनी दिली. श्रीलंकेतील परिस्थिती पहाता भारतात असे काही घडू शकते का, या प्रश्नावर अब्दुल्ला म्हणाले की, काहीही होऊ शकते. आम्हाला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागू नये अशी प्रार्थना करतो असे ही त्यांनी नमूद केले. भारतात श्रीलंकेसारखी स्थिती उद्भवू नये यासाठी भारत सरकारने पावले उचलावीत असे आवाहनही त्यांनी केले. व