मुंबई – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाने एकीकडे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोलमडले, तर दुसरीकडे शिवसेना पक्ष देखील मुळापासून हलला आहे. माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सध्या पक्ष व पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण वाचवण्यासाठी धडपड सुरु आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांनंतरही शिंदे समर्थक नगरसेवक देखील शिंदे गटात सामील होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सेनेला एका मागून एक धक्के बसत असतानाच आता भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने सेनेचे १२ खासदार संपर्कात असल्याचे सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाजप खासदार रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबतचा दावा केला आहे. “शिवसेनेचे १२ खासदार आमच्या संपर्कात आहेत. मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, यासाठी तीन-चार खासदारांनी उद्धव ठाकरेंना पत्र दिलं आहे. राहुल शेवाळे हे दादरमधून निवडून आले आहेत. या मागणीनंतर शिवसेनेनं भावना गवळी यांची हकालपट्टी केली आहे. ही नावं उघड झाली म्हणून मी सांगतोय, बाकी नावं सांगत नाही.” असा दावा दानवे यांनी केला.
तत्पूर्वी, राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेनं भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, असं पत्र शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि अन्य काही खासदारांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. आमदारांच्या बाबतीत जे घडलं ते खासदारांच्या बाबतीत घडू नये यासाठी शिवसेनेने यापूर्वीच भावना गवळी यांना पक्ष प्रतोदपदावरून हटवत त्यांच्या जागी राजन विचारे यांची नियुक्ती केली आहे.
संजय राऊतांवर गंभीर आरोप
“बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील एक-एक माणूस वेचून एवढी मोठी शिवसेना उभी केली आहे. त्या शिवसेनेचे तुकडे-तुकडे करण्यात संजय राऊतांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे आता तरी स्वत:ला सावरा, वाक्य जपून वापरा, जी शिवसेना तुमच्या हातात उरली आहे, त्यांना तरी फुटू देऊ नका. शिवसेनेत आता केवळ दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत. ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे.” संजय राऊत यांच्यावर असा गंभीर आरोप करत त्यांनी सेनेच्या सद्य स्थितीचा उपहास केला.
उद्धव ठाकरे आमचे पूर्व मित्र
उद्धव ठाकरे यांना सद्य राजकीय परिस्थितीत काय सल्ला द्याल असा सवाल मंत्री दानवे यांना विचारला असता त्यांनी, “उद्धव ठाकरे आमचे प्रिय मित्र होते, आता ते आमचे पूर्व मित्र आहेत. त्यामुळे त्यांना आमचा एकच सल्ला आहे. ज्या विचारांना तिलांजली देऊन त्यांनी जे सरकार स्थापन केलं होतं. ते सरकार त्यांच्या आमदारांना आणि राज्यातील जनतेला मान्य नव्हतं. त्यामुळे जे व्हायचं होतं, ते झालं आहे. आता त्यांनी शांततेनं राहावं. आमदार आणि खासदारांना बोलण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षात जी पिल्लावळ सोडली आहे. त्यांना त्यांनी थांबवावं. मुडदे परत येतील, गुवाहाटीला रेडे पाठवले, अशी वक्तव्य न शोभणारे आहेत. त्यामुळे त्यांनी ही भाषा बंद करून एक सरळमार्गी राजकारण करावं, असं माझं मत आहे.” असं उत्तर दिलं.
मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्ह्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली येथे त्यांनी अमित शहा, राजनाथ सिंह, जे पी नड्डा या भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेतली. ते आज (शनिवार ९ जुलै) पंतप्रधान मोदींनीही भेट घेतील. सर्वोच्च न्यायालयात ११ जुलै रोजी शिंदे गटातील आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तसेच १८ जुलैला राष्ट्रपती निवडणूक देखील होणार आहे. या महत्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा दिल्ली दौरा व भेटीगाठींना विशेष महत्व पटापट झाले आहे.
अशातच आता दानवे यांनी सेनेचे १२ खासदार संपर्कात असल्याचे म्हंटल्याने शिंदे आगामी राष्ट्रपती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही नवी डील तर करण्यासाठी तर दिल्ली दाखल झाले नाहीत ना अशी चर्चा सुरु झाली आहे.