हनुमान चालिसेचे सामूहिक पठण केल्याच्या कारणावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मतदार संघ असलेल्या जिल्ह्यातील सीहोर येथील वेल्लोर इन्स्टिट्युट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी (वीआयटी) या खासगी विद्यापीठातील 7 विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड विद्यापीठ प्रशासनाने सुनावला आहे. या घटनेची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारमधील गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गंभीरतेने दखल घेतली आहे.
त्यांनी सांगितले की, भारतात हनुमान चालिसेचे पठण करणार नाही, तर कोठे करणार. विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलेली ही कारवाई योग्य नसून विद्यार्थ्यांना असा कोणताही दंड भरण्याची आवश्यकता नाही. तशा सुचना तेथील जिल्हा प्रशासन आणि विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच, या घटनेच्या चौकशीचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे गृहमंत्री मिश्रा यांनी सांगितले.
नेमकी काय आहे घटना…
‘वीआयटी’च्या हॉस्टेलमधील 20 विद्यार्थ्यांनी सामूहिक हनुमान चालिसाचे पठण केले होते. यावर आक्षेप घेत हॉस्टेलमधील काही विद्यार्थ्यांनी याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईला तेथीलच 7 विद्यार्थ्यांनी विरोध करत सामूहिक हनुमान चालिसाचे पठण करणाऱ्या विद्यार्थ्यांची बाजू मांडली होती. मात्र, प्रशासनाकडून त्यांची बाजू न समजून घेता हनुमान चालिसाचे पठण करणाऱ्या विद्यार्थ्यांची बाजू मांडणाऱ्या 7 विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. जे की हे प्रकरण विद्यार्थ्यांना समज देवूनही मिटवता आले असते.
दरम्यान, तेथील जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. विद्यापीठ प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, हॉस्टेलच्या रुममध्ये तेथे राहणारी व्यक्ती वैयक्तिक पूजा-पाठ करू शकते. मात्र, रुम किंवा हॉस्टेलच्या लॉबीमध्ये परवानगी न घेता असे करणे योग्य नाही.