प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 -राज्यातील 6 जिल्ह्यांतील 9 तालुक्यांतील 114 गावांमधील भू-जल पातळीत 1 मीटरपेक्षा जास्त घट झाली आहे. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याची दाट शक्यता वर्तवली आहे. भू-जल पातळीत घट झालेल्यांमध्ये सातारा जिल्ह्यात सर्वाधिक 56 गावांचा समावेश आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील 31 गावांमधील भू-जल पातळीही खालावली आहे. यंदा पावसाने जोरदार कृपादृष्टी न दाखविल्यास ही भू-जल पातळी आणखी खालावण्याचीच अधिक शक्यता असून पाणीटंचाईचा प्रश्न आणखी बिकट बनण्याचा धोका आहे.
भू-जल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे दरवर्षी एका जलवर्षातून चारवेळा पाणलोटक्षेत्र निहाय निश्चित केलेल्या विहिरींमधील भू-जल पातळीचा अभ्यास करण्यात येतो. भू-जलाची उपलब्ध मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या नैत्रत्य मोसमी पावसावर अवलंबून असते. सप्टेंबरअखेर राज्यातील पर्जन्यमान व ऑक्टोबरमधील भू-जल पातळी यांच्या नोंदी घेऊन सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान व भू-जल पातळीत झालेली वाढ अथवा घट यांचा तुलनात्मक अभ्यास करून राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत अनुमान काढण्यात येत असतात. ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीत जलधरातून विविध कामासाठी सिंचनाकरिता व पिण्याच्या पाण्यासाठी झालेला भूजल उपसा, भू-जल पातळीत झालेला बदल याची माहिती निरिक्षण विहिरीमधील घेतलेल्या स्थिर भूजल पातळीच्या अभ्यासावरून समजते.
राज्यातील 2 हजार 978 विहिरीमधील भू-जल पातळीमध्ये सरासरीपेक्षा वाढ तर 720 निरिक्षण विहिरींमधील भू-जल पातळीत सरासरीच्या तुलनेत घट आढळून येते. यापैकी 18 निरिक्षण विहिरीतील भू-जल पातळीत 3 मीटरपेक्षा जास्त घट झालेली आहे. 33 निरिक्षण विहितीतील भू-जल पातळीत 2 ते 3 मीटर एवढी घट झालेली आहे. 119 निरिक्षण विहिरीतील भू-जल पातळीत 1 ते 2 मीटने घट, 550 विहिरीतील भू-जल पातळीत 0 ते 1 मीटर एवढी घट झाल्याचे आढळून आहे आहे.
राज्यात बारामतीमधील 4 व शिरुरमधील 1 अशा एकूण 5 गावांमध्ये भूजल पातळी 2 ते 3 मीटरने खालावली आहे. 1 ते 2 मीटरने भू-जल पातळीत घट झालेल्यामध्ये 109 गावांचा समावेश आहे. जानेवारी, मार्च, मे अखेरीस भू-जल पातळीचा तुलनात्मक अभ्यासाद्वारे पाणी टंचाई परिस्थितीचा अंदाज व्यक्त केला जातो. भू-जल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आयुक्त चिंतामणी जोशी यांनी भू-जल
सर्वेक्षणाबाबत अहवाल जाहीर केला आहे.