मुंबई – मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षांचं पद हे रिक्त आहे. नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने अनेकदा हे पद भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वादामुळे आणि कायदेशीर पेचामुळे हे पद भरता आले नाही. आता बहुमताने आकडे फिरल्याने पुन्हा विधानसभा अध्यक्षांच्या निवड पार पडली. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानतंर सभागृहात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांना खुर्चीपर्यंत नेलं. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना ऐकून १६४ मत मिळाली.
आज कामकाजाला सुरुवात होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,’आज महाराष्ट्राने नवा रेकॉर्ड केला आहे. राहुल नार्वेकर महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. हे कायदेमंडळ असून वेगवेगळे कायदे करतो. प्रत्येकाचा विचार, आशा, अपेक्षा या सभागृहात सदस्यांच्या माध्यमातून मांडल्या जातात. त्या सोडवण्याची क्षमता या सभागृहात आहे.’ असंही फडणवीस म्हणाले