विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनादरम्यान भाजपच्या राहुल नार्वेकर यांची बहुमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राहुल नार्वेकर कुठेही गेले तरी पक्षाच्या नेतृत्वाला फार जवळ करतात असं स्पष्ट मत यावेळी अध्यक्षांच्या निवडीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं.
आतापर्यंत सर्व अध्यक्षांनी न्याय देण्याचं काम केलं आहे. महाराष्ट्राच्या विकासाची कामं गतिमान होतील सभागृहाची अपेक्षा आहे. आपलं नाव जोडलं गेलं आहे हा मोठा सन्मान असल्याचं देखील अजित पवार यावेळी म्हणाले. शिवसेनेत गेल्यानंतर आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीत मला आणि भाजपात गेल्यानंतर फडणवीसांना जवळ केले. आता एकनाथ शिंदे तुम्हीही जवळ करा, नाहीतर काही खरं नाही, असा टोलाही दादांनी यावेळी लगावला,
मला मावळमध्ये उमेदवार हवा होता तेव्हा मी तुम्हाला विनंती केली. मोदी लाटेत राहुल नार्वेकर यांचा पराभव झाला. पण ते फार हुशार आहेत, माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा असं सांगितलं होतं, असं म्हणत अजित पवार यांनी नार्वेकर यांच्या चाणाक्षपणाचे कौतुक केले.
एकनाथ शिंदे यांनी माझ्या कानात जरी सांगितलं असत तरी पुढची अडीच वर्ष आम्ही त्यांना दिली असती असं म्हणत अजित पवारांनी सभागृहात एकच हशा पिकवला. राहुल नार्वेकर यांचा मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीनही भाषेवर प्रभुत्व आहे ही चांगली बाब आहे. तसेच नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई असल्यामुळे ते सासरच्यांवर म्हणजेच आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही असं देखील अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.
दीपक केसरांनाही टोमणा
समोर पाहिलं तर मूळचे भाजपाचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्तच पहायला मिळत आहेत. ते पाहून मूळच्या भाजपाच्या लोकांचं वाईट वाटतं.दिपक केसरकर तर आता कसले प्रवक्ते झाले आहेत. आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही, असा खरमरीत टोलाही यावेळी पवारांनी लगावला.