पिंपरी – करोनाकाळात अनेक उद्योग-व्यवसाय डबघाईला आले. परंतु भारतातील आयटी क्षेत्र कठीण काळातही तग धरुन होते. लॉकडाऊन संपल्यानंतर इतर उद्योग-व्यवसायांना पुन्हा जम बसविण्यासाठी कष्ट घ्यावे लागत आहेत. मात्र आयटी क्षेत्रात मोठी भरभराट पहावयास मिळत आहे. या क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात भरती सुरू आहेत. दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धाचे आपल्या देशासह जगावर विपरीत परिणाम झाले. परंतु भारतातील आयटी कंपन्यांकडे मात्र आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कामाचा ओघ वाढला आहे.
युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यावर्षी आयटी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप अधिक प्रमाणात भरती सुरू आहे. परंतु नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांनी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेण्याची गरज आहे की, आयटी कंपन्यानी नोकरी देण्यासाठी कोणतेही शुल्क मागत नाहीत. एवढेच नव्हे तर ज्या प्लेसमेंट एजन्सींना काम देतात, त्यांनाही कंपन्याना स्वतः त्याचा मोबादला देत असतात आणि उमेदवाराकडून कोणतीही रक्कम न घण्याचे बजावलेले असते. फसवणुकीच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. त्यामुळे कुणासही नोकरीसाठी पैसे देऊ नयेत.
– हरप्रीत सलूजा, अध्यक्ष, नेसेन्ट इनफार्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लाइज सीनेट
रशिया युक्रेन युद्धामुळे युक्रेनमधील बहुतेक उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. युक्रेनमध्ये पाश्चात्य देशातील बड्या कंपन्यांसाठी काम करणाऱ्या अनेक आयटी कंपन्या आहेत. या कंपन्यांचे देखील काम ठप्प झाल्याने पाश्चात्य देशातील कंपन्यांनी आपले काम भारतीय आयटी कंपन्यांकडे वळविले आहे. पर्यायाने लहान-मोठ्या सर्वच आयटी कंपन्यांकडे सध्या अनेक प्रोजेक्ट येत आहेत. यामुळे मनुष्यबळाचीही गरज वाढली आहे.
नोकरीच्या नावाखाली दुकानदारी
शहरात दहा हजाराहून अधिक लहान-मोठे उद्योग आहेत. तसेच आयटीनगरी अशी देखील या शहराची ओळख आहे. त्यामुळे या शहरात नोकरी मिळेल या आशेने देशभरातून मोठ्या संख्येने तरुण येतात. यामुळे नोकरी देण्याच्या नावाखाली अनेक दुकाने प्लेसमेंट एजन्सी नावाने उघडली आहेत. मोठ-मोठ्या आयटी कंपन्यांत आयटीयन्स म्हणून नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणुकींचे अनेक प्रकार आतापर्यंत घडले आहेत. विशेषतः आयटी कंपनीत नोकरी लावून देतो, त्यासाठी रजिस्ट्रेशन फी, अमुक प्रशिक्षण बंधनकारक असल्याने त्याचे शुल्क अशा अनेक कारणांनी आर्थिक फसवणूक केली जाते.
एजन्सीद्वारे खूप कमी भरती
आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करण्यासाठी शहरात येणाऱ्या तरुणांमध्ये दक्षिण आणि उत्तर भारतातील तरुणांची संख्या अधिक आहे. शहरात असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी, अशी स्वप्ने घेऊन आलेल्या तरुणांना नोकरीचे सौदागर सहजरित्या जाळ्यात ओढतात. परंतु आयटी क्षेत्रातील कंपन्या केवळ 25 टक्के भरतीच प्लेसमेंट एजन्सीच्या माध्यमातून करतात. ते ही अधिकृत एजन्सीद्वारे. या एजन्सींना कंपन्या स्वतः त्यांच्या कामाचे शुल्क देतात. कोणत्याही उमेदवाराकडून पैसे घेण्याची त्यांना परवानगी नसते. बहुतेक भरती ही थेट कंपनीद्वारेच होते.
सोशल मीडियाद्वारे ओपनिंग च्या जाहिराती
करोनाकाळानंतर सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने केवळ नोकरी भरतीसाठी अनेक व्हॉट्स ऍप आणि फेसबुक ग्रुप तयार झाले आहेत. या ग्रुपवर सध्या मोठ्या प्रमाणावर ओपनिंगच्या जाहिराती दिसत आहेत. तसेच अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये असलेल्या रिक्त जागांची माहिती देतात. एवढेच नव्हे तर चांगला उमेदवार सुचविल्यास कर्मचाऱ्याला बक्षीस रक्कमही दिली जाते. यामुळे कार्यरत कर्मचारी आपल्या कंपनीमधील भरतीची माहिती सोशल मीडियावर टाकत असतात.