ज्ञानेश्वर फड/ प्रीतम पुरोहित
सासवड –संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी सासवड मुक्कामी निघाला. या सोहळ्यात दिवे घाट हा अवघड टप्पा आहे. 30 किलोमीटर अंतर आणि त्यात दिवे घाट. सोहळ्यात ज्येष्ठ वारकऱ्यांची संख्या अधिक असते. अशावेळी वारकऱ्यांचा थकवा घालण्यासाठी आणि त्यांचे पाय मोकळे करण्यासाठी काही भाविक हे मनोभावे सेवा करतात. अनेक सेवाभावी संस्थादेखील या सेवा कार्यात सहभागी होतात.
सासवड येथील अरुण पिसे आणि सविता पिसे, हे दाम्पत्य आणि अरुण यांच्या वहिनी जयश्री यांनीही यंदा थकलेल्या वारकऱ्यांच्या पायाची मालिश करत त्यांचा थकवा घालवला. अरुण पिसे हे पानदुकान चालवतात. तर पत्नी सविता या गृहिणी आहेत. पालखी सोहळा सासवड मुक्कामी असता दोन दिवस ते आपला व्यवसाय बंद ठेवतात. अरुण हे गेली आठ वर्षांपासून ही सेवा करतात.
दरम्यान, मागील वीस वर्षांपासून वारकऱ्यांची मालिश करण्याची सेवा करणारे अशोक राठी म्हणाले, “माउलींची पालखी सासवड मुक्कामी असते, त्यावेळी आम्ही पालखी मुक्काम तळाशेजारी बसून वारकऱ्यांच्या पायाची मालिश करतो. आम्ही आठ ते दहा जण दिवसभर ही सेवा करतो. दिवसभरात पाच हजारांहून भाविकांचे पाय मोकळे करून देतो. यासाठी आम्ही 15 लिटर तेल आणले होते. यावेळी पाच हजारांहून अधिक वारकऱ्यांची सेवा केली. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून विशेष समाधान वाटते. त्याची तुलना कशाशीही करता येत नाही. जोपर्यंत आमचे प्राण आहेत, तोपर्यंत हो सेवा सुरू ठेवणार.
माझे पती गेल्या आठ वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करतात. दिवे घाट चढून थकलेल्या वारकऱ्यांचे पायाची मालिश करतात. यावर्षी मी आणि माझी जाऊ जयश्री आम्हीही वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी झालो. सेवेनंतर वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता, ते पाहून आम्हाला खूप समाधान वाटत आहे. व्यवसायामुळे तसेच काही अडचणीमुळे आम्ही वारीत सहभागी होऊ शकत नाही. मात्र वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा म्हणून आम्ही हे कार्य केले. हे माझे सेवेचे पहिलेच वर्ष होते. मात्र यापुढे आता दरवर्षी ही सेवा सुरू ठेवणार.
– सविता अरुण पिसे,सासवड