पिंपरी – श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात मंगळवार (दि.21) रोजी सायंकाळी शहरात दाखल झाला. पालखी सोहळा आकुर्डीतील श्री विठ्ठल रूक्मिनी मंदिरात दुसऱ्या मुक्कासाठी सायंकाळी सातच्या सुमारास दाखल झाला. यावेळी भाविकांनी पालखीवर फुलांची मुक्तपणे उधळ करत ग्यानबा-तुकारामचा जयघोष केला.
करोनाच्या महामारीनंतर दोन वर्षांनंतर पालखी सोहळा निर्बंधमुक्त होत साजरा होत आहे. त्यामुळे भाविकांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. आकुर्डीत पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. अनेक जण पालखी सोहळ्याचे आनंदाचे क्षण कॅमेऱ्याच कैद करत होते. यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषेत अनेक चिमुकले लक्ष वेधून घेत होते. तसेच महिला भाविकांनी फुगड्यांचा आनंद घेतला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आकुर्डीत पालखी दाखल झाल्यानंतर साडेसातच्या सुमारास समाज आरती झाली. त्यानंतर रात्री अकरा वाजता आरती आणि पहाटे चार वाजता महापालिका आयुक्त राजेश पाटील, विश्वस्तांच्या हस्ते अभिषेक, आरती होणार आहे. त्यानंतर पाच वाजता पालखी सोहळा उद्योगनगरीतून पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. आकुर्डी परिसरात पालखीचा दुसरा मुक्काम आहे. त्यामुळे आकुर्डी, निगडी परिसराला जत्रेचे स्वरूप आले असून वैष्णवांच्या उपस्थितीने उद्योगनगरी दुमदुमली आहे.