16 जून 2013 च्या केदारनाथ प्रलयावेळी घटनास्थळी असूनसुद्धा आम्ही सुखरूप घरी परतलो, ही केदारनाथाचीच आमच्यावर झालेली कृपा आहे. त्या घटनेचे चित्तथरारक कथन…
जुन 2013 साली मी, अरुणा बालवडकर, प्रसाद, मनीषा आणि जयश्री वांजळे, माझी आई शांताबाई तापकीर, इंदुबाई आणि माझी मैत्रीण वैशाली अवसरे अशा आम्ही चारधाम यात्रेला जाण्याचे निश्चित केले. आमच्या चारधाम यात्रेसाठी आम्ही पुण्याहून 8 जून 2013 रोजी लोहगाव विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण केले. दिल्ली विमानतळावर पोहोचलो. त्यानंतर चारधाम यात्रेकरिता हरिद्वारकडे प्रयाण केले. आमचा ग्रुप चाळीस माणसांचा होता. हरिद्वार-बरकोट असा दिवसभराचा प्रवास करून आम्ही बरकोट येथे पोहोचलो. 10 जून रोजी यमुनोत्री दर्शन करून पुन्हा बरकोट येथे मुक्काम केला.
दुसऱ्या दिवशी बरकोट ते उत्तरकाशी प्रवास करून आम्ही उत्तरकाशी येथे मुक्काम केला. पुढे गंगोत्री दर्शन झाले. निसर्गाने मुक्त हस्ते केलेली सौंदर्याची उधळण पाहून स्वर्ग जणू पृथ्वीवरच असल्याचा भास झाला. गंगोत्रीच्या जाण्यायेण्याच्या मार्गावरील सफरचंदाच्या बागा, धबधबे, रंगीबेरंगी फुले, दुधासारखे पांढरेशुभ्र फेसाळणारे आणि आपल्याच धुंदीत मुक्तपणे स्वत:ला दऱ्याखोऱ्यात झोकून देणारे धबधबे पाहून सर्वांचेच भान हरपले. राम तेरी गंगा मैली या चित्रपटाचे शूटिंग झालेले हर्षिलगाव, मंदाकिनी धबधबा, हर्षिल गावातील काही नागरिकांशी संवाद झाला. खरोखरीच निर्सगाच्या कुशीत राहून तेथील लोकांनी जपलेला माणुकीचा जिवंत झरा, स्नेह, आपुलकीचा अनुभव आला.
पुढे संपूर्ण उत्तरकाशी दर्शन केले. आता आमचे पुढील ध्येय होते “केदारनाथ दर्शन’. मनात केदारनाथ दर्शनाचे वेध लागले होते. अवघे मनच “केदारनाथ मय’ झाले होते. केदारनाथ मार्गावरील म्हणजेच गौरकुंड येथे जाण्यासाठी असणारे रस्ते फारच अरुंद आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडू नये म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो. आमची बस आम्हास गौरीकुंड येथे सोडणार होती व तेथून आम्ही सोयीस्कर पर्याय निवडून पुढील 17 किलोमीटरचा प्रवास गौरीकुंड ते केदारनाथ करणार होतो. शासकीय पर्ची घेऊन घोड्यावरून पुढील प्रवासासाठी सुरुवात केली. मी निर्सग सौंदर्याचा आनंद घेत, वारा, पाऊस अंगावर झेलत पुढे जात होते.
मजल दरमजल करत अखेर आम्ही घोडे थांबतात त्या ठिकाणी म्हणजेच मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर पोहोचलो. तेथून चालत जावे लागणार होते. आम्ही एकमेकीच्या हाताला धरून चालण्यास सुरुवात केली. एक टप्पा असा आला की, दोन डोंगराच्या दरीवरील लाकडी पुलावरून जायचे होते व डोंगरावरून प्रचंड वेगाने पुलावर धबधबा कोसळत होता. त्यानंतर पुन्हा शंभर पायऱ्या चढणे आणि दीडशे पायाऱ्या उतरणे होते. त्यानंतरच केदारनाथ मंदिर दृष्टीस पडत होते. आम्ही हा टप्पा पार केल्यानंतर मंदिर दिसताच मला आनंद झाला. प्रवासाचा सर्व शीण निघून गेला. मंदिरास झेंडूच्या फुलाची आरास होती. समोर नंदी महाराजाची आकर्षक देखणी भव्य मूर्ती होती. मंदिरात प्रवेश करताना नंदीच्या मूर्तीच्या अलीकडे कमान होती आणि त्यावर घंटा होती. आम्ही घंटा नाद केला.
भयंकर थंडी होती, जसजशी रात्र होऊ लागली तसतसा पाऊस वाढत होता, थंड वारे वाहात होते. हवेतील गारवा आणखी तीव्र होत होता. आम्ही चहा घेऊन गप्पा मारत असतानाच आम्हाला प्रचंड वेगाने पाणी वाहात असल्याचा आवाज येत होता. खिडकी उघडून पाहिले असता प्रचंड वेगाने आमच्या मुक्कामाच्या इमारती जवळून पाणी वाहात असल्याचे दिसले; परंतु त्यावेळी काही अघटीत घडेल याची तसूभरही कल्पना मनात आली नाही. आम्ही दिवस उजडण्याची वाट पाहात प्रवास करत होतो. सकाळ होत होती. आमचा तासाभरापूर्वी सुरू झालेला प्रवास पाऊस थांबण्याची व सूर्य दर्शन होण्याची वाट पाहात होता. सुमारे अर्धा तासच दिवस उजाडून झाला असेल नसेल तोच काळाकभिन्न अंधार दाटून आला. जणू काही पुन्हा रात्र झाली. प्रवासासाठी समोरची वाट दिसेनाशी झाली. बाहेर मुसळधार पाऊस चालू होता, रात्रीचे दोन वाजून गेले होते. सर्व ग्रूपची पुढील प्रवासास निघण्यासाठी तयारी झाली. सर्वजण बसमध्ये बसल्यानंतर प्रवासाला सुरुवात झाली. प्रचंड पाऊस आणि वारे यामुळे प्रत्येकांच्या मनात एकप्रकारची भीती दाटून येत होती.
कोणीही कोणाशी बोलत नव्हते. प्रवास करत असताना अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याचे पाहिले. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास डीझेल भरण्यासाठी बस पंपावर पोहोचली असता प्रचंड गर्दी व माणसे सैरावैरा पळत असल्याचे दिसले. त्याच ठिकाणी केदारनाथ येथे रात्री काही तरी अघटीत झाल्याचे समजले. टिहरी डॅम फुटल्याचे आणि उत्तराखंडचे संपूर्ण पॉवर हाऊस पाण्याने वाहून गेल्याचे समजले. तसेच अनेक पूल, इमारती, घरे देखील वाहून गेल्याचे समजले. तसेच नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अनेक मृतदेह, कपड्याची गाठोडी, मृत घोडे, खेचरे, तसेच अनेक गाड्या वाहून जात असल्याचे आम्ही प्रत्यक्ष बघितले. आता खरोखरच आम्ही घरी कधीच जाणार नाही असे आम्हाला वाटले. शेजारीच असणाऱ्या पुलावरून एक एक गाडी जाण्यास सुरुवात झाली. परंतु पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, सदरचा लोखंडी पूल कोणत्याही क्षणी वाहून जाणार होता. तरीही सर्वजण जीवावर उधार झाले होते. आमची बस पुलावरून जात असताना पाण्याच्या वेगाने पूल प्रचंड हालत होता. नदीच्या दोन्ही काठावरील लोक जोरजोराने ओरडत होते. तसेच अनेकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. आमची बस पुलावरून शेवटच्या टप्प्यावर असताना पाण्याच्या वेगाने पुलास प्रचंड हिसका बसला.
आमच्या बसची मागील चाके पुलावरच होती, प्रसंगावधान राखून आमच्या बसचालकाने बसचा वेग वाढवला. त्यामुळे बस पुलावरून पुढे जाऊन डोंगरास धडकली व लोखंडी पूल पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. आमची बस डोंगरास धडकून डोंगरावरील संपूर्ण पाणी, राडारोडा आमच्या बसमध्ये आला. परंतु आम्ही सर्वजण सुखरूप राहिलो. पुढचा प्रवास करून आम्ही उत्तराखंडमधील बद्रीनाथ मार्गावर आलो. सदरचा जिल्हा हा चामोली जिल्हा होता. गोचर शहरातील इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या मैदानावर आमची बस थांबली. प्रत्येकाचा धीर आता सुटत चालला होता. पोलिसांनी बद्रीनाथकडे जाणाऱ्या सर्व गाड्या येथे थांबवून पुढे जाण्यास बंदी केलेली होती. गोचर या ठिकाणी एक दिवस राहण्यासाठी सोय झाली.
आम्ही भगवती रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर आमच्या खोल्या ताब्यात घेतल्या. सर्वत्र हाहाकार माजला होता. पोलिसांची गस्त सतत चालू होती. पोलीस लोकांना कुणीही बाहेर पडू नये म्हणून सांगत होते. सतत सायरनचा आवाज येत होता. आम्ही सदर ठिकाणी चार दिवस राहिलो. परंतु पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. चौथ्या दिवसी पाऊस थांबला व आकाशात इंद्रधनुष्य दिसताच सर्वांना हायसे वाटले. आम्ही पुढील प्रवासासाठी बद्रीनाथ येथे न जाता परतीच्या प्रवासासाठी म्हणजे हरिद्वार येथे जाण्यासाठी निघालो. परंतु सर्व ठिकाणी रस्तेच राहिले नव्हते.
डोंगर आणि नद्या एकच झाले होते. युद्धपातळीवर मिलिटरीने रस्ते तयार करण्यास घेतले होते. त्या कामासाठी चार दिवस आणखी लागणार होते. त्यामुळे आम्ही अक्षरशः रडकुंडीला आलो होतो. पुढे आमची बस तेथेच सोडून आमच्या परतीच्या प्रवासासाठी पर्यायी रस्ता निवडला. तो रस्ता इतका धोकादायक होता की, डोंगरावरून रस्त्यावर सतत पाणी पडत होते. रस्ता निसरडा झाला होता. गाडीची चाके जागेवरच फिरत होती. एक गाडी जाऊ शकेल एवढ्याच रुंदीचा रस्ता होता. कुठे कुठे तर दोन्ही बाजूला प्रचंड खोल दऱ्या होत्या. दऱ्यामध्ये अंधारच अंधार दाटलेला होता. कोणत्या क्षणी गाडी दरीत कोसळेल हे सांगता येत नव्हते. अशा रस्त्याने प्रवास करून आम्ही गढवाल येथे पोहोचलो. तेथून पुन्हा हरिद्वार येथे जाण्यासाठी छोट्या बसने जाण्याचे ठरविले. या बस प्रवासात देखील खूपच धोकादायक रस्त्याने प्रवास करून हरिद्वार येथे पोहोचावयाचे होते. कोणीही भीतीमुळे झोपू शकले नाही.
आम्ही मुक्काम केलेले भगवती रिसॉर्ट देखील वाहून गेल्याचे समजले. इतकेच काय पण उत्तरकाशी येथील आम्ही मुक्काम केलेले हॉटेल देखील वाहून गेल्याचे समजले. आम्ही मुक्काम केलेल्या ठिकाणी आमचा मुक्काम हालल्यानंतर तासाभराच्या अवधीने वाहून गेल्याचे समजले. केदारनाथचा प्रलय देखील आम्ही तेथून मुक्काम हालविल्यानंतर काही तासातच झालेला होता. त्यामुळे आम्ही केदारनाथ प्रलयातून सुदैवाने बचावलो. हरिद्वार येथे पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावरून आम्ही पुणे येथील लोहगाव विमानतळावर आलो.
ऍड. गितांजली बालवडकर