निसर्गानं निर्माण केलेल्या गोष्टी आणि प्रणाली खरोखरीच अद्भुत अशाच म्हणाव्या लागतील. विविध जीवांमधील अतिशय गुंतागुंतीची रसायनं, तितक्याच व्यामिश्र प्रक्रिया, अतिसूक्ष्म यंत्रणा या सगळ्या गोष्टी अगदी थक्क करणाऱ्या आहेत. आपल्या अनेक प्रश्नांची उकल आपण निसर्गाकडे पाहून-म्हणजेच निसर्गानं त्याच प्रश्नाचं समाधान कसं केलं आहे याचा अभ्यास करून शोधू शकतो. निसर्गातील या पद्धतींचं अनुकरण करण्याच्या प्रकाराला इंग्रजीत “बायोमिमिक्री’ म्हणतात. त्यालाच मी “जैवानुकरण’ असं संबोधलं आहे.
पद्धतशीरपणे जैवानुकरण करण्यास अलीकडेच सुरुवात झाली असली तरी प्राचीन काळापासून मानवानं निसर्गाकडून अनेक गोष्टी शिकून त्यांचं अनुकरण केलं आहे. प्राचीन इजिप्तमधील मंदिरांमध्ये उभारलेल्या खांबांची रचना तिथे उगवणाऱ्या ताडसदृश झाडांनी प्रेरित केली आहे. अगदी आपल्याकडेही अनेक शतकं घरांचं छप्पर, खांब आणि वासे जुन्या नारळाच्या झाडाच्या झावळ्या आणि खोडं यांपासून बनवले जात हे जैवानुकरणाचंच उदाहरण नव्हे काय? केरळमध्ये अनेक शतकांपासून सुस्थितीत असलेलं एक मंदिर हे नारळाच्या खोडांवर उभारलेलं आहे.
जैवानुकरणाचा व्यवस्थित अभ्यास मात्र काही दशकांपूर्वी सुरू झाला. विविध क्षेत्रांमध्ये जैवानुकरणाचा वापर होताना दिसून येतो. नवकल्पना (इनोव्हेशन) या क्षेत्रात तर जैवानुकरणानं क्रांतीच केली आहे, असं म्हणावं लागेल. याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपण दैनंदिन व्यवहारात वापरतो ते व्हेल्क्रो. जॉर्ज द मेस्ट्राल नावाच्या स्विस इंजिनिअरनं त्याचा शोध लावला. तो सुटीवर असताना आल्प्स पर्वतातील जंगलात फिरायला गेला.
तिथून परतल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या विजारीच्या तळाला तसंच त्याच्या कुत्र्याच्या केसांना काहीतरी चिकटलेलं आहे की जे काढायला खूप कठीण आहे. आपल्याकडच्या चिकटगुंड्यासारख्या एका वनस्पतीच्या फळबियांनी हा चमत्कार केला होता. मात्र चिडून न जाता मेस्ट्रालनं त्याचा बारकाईनं अभ्यास केला आणि जैवानुकरण करून व्हेल्क्रो हे उत्पादन जन्माला आलं. आज आपण अनेक वस्तूंत याचा वापर करीत असलो तरी अंतराळवीरांसाठी हे मोठं वरदान आहे. अवकाशयानात ते तरंगत असल्यामुळे हाताच्या आणि पायाच्या आवरणावर लावलेल्या व्हेल्क्रोमुळे ते इच्छित ठिकाणी विनासायास जाऊ शकतात.
मी स्वत: अभ्यास करून अळू आणि कमळ या वनस्पतींच्या पानांवर असलेल्या विशिष्ट रासायनिक स्फटिकांच्या रचनेचं जैवानुकरण काचेवर करून काचेला जलविरोधक बनवण्याचा प्रयत्न केला होता ज्यायोगे वाहनांमध्ये वायपरची आवश्यकता भासणार नाही. अर्थात् वनस्पतितज्ज्ञांचं अपेक्षित सहकार्य न मिळाल्यानं पुढे प्रगती झाली नाही.
वास्तुविशारदांनीदेखील जैवानुकरण केलं आहे. झिंबाब्वेची राजधानी हरारे इथं एका मोठ्या इमारतीची रचना करण्यात आली आहे. या इमारतीत वातानुकूलन (एअरकंडिशनिंग) नाही. आफ्रिकेतील विशिष्ट मुंग्यांच्या उंचच्या उंच वारुळात उष्णतेचा सामना कसा केला जातो त्याचा अभ्यास करून या इमारतीची रचना केली आहे. गमतीचा भाग असा की इमारतीच्या आकारावरून याची बांधणी मुंग्यांच्या वारुळाच्या वायुवीजन तत्त्वावर केली आहे असं मुळीच लक्षात येणार नाही कारण आकार आधुनिक इमारतींसारखाच आहे. दिल्लीच्या बहा’ई लोटस टेंपल याची रचनाही निसर्गामधील वायुवीजनाचं जैवानुकरण करून केली आहे.
कोळ्याच्या जाळ्यामधील धाग्याचा खोलवर अभ्यास करून त्या प्रकारचा कृत्रिम धागा तयार करता येईल, असं शास्त्रज्ञांना वाटतं. तसं झालं तर अगदी हलक्या वजनाचे पण शक्तिशाली आणि विस्मयकारक गुणधर्म असलेले धागे, वस्रंच तयार करता येतील. त्यापासून मजबूत व खिशातही मावू शकतील अशा हवाई छत्र्याही तयार करता येतील.
एका विशिष्ट प्रजातीच्या सरड्यावर संशोधन केल्यावर असं लक्षात आलं की तो केवळ छतावर उलटा स्थिर राहतो एवढंच नव्हे तर त्या स्थितीत चालूही शकतो. त्याच्या पंज्यावरील केस, वाटीसारख्या सूक्ष्म रचना आणि खास चिकट द्रव यांचं जैवानुकरण केल्यास वैशिष्ट्यपूर्ण मोजे बनवून माणसालाही छतावर उलटं फिरता येईल. आहे की नाही गंमत?
निसर्गानं कुबड्या देवमाशाच्या कल्ल्यांची रचना पाण्यातून सहजरीत्या आणि कमीत कमी ऊर्जा वापरून गती साध्य होईल अशी केली असल्यानं त्या रचनेचा फायदा पाणबुड्या बोटी तसंच विमानांच्या रचनेत होऊ शकेल. निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि त्या गोष्टींचं अनुकरण केल्यास मानवी जीवन समृद्ध होईल यात शंका नाही.
– श्रीनिवास शारंगपाणी