सोलापूर – नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालानंतर अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना बार्शीतील ब्रम्हचैतन्य नगरमध्ये उघडकीस आली आहे. सृष्टी बोंदर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. ती मुळची उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील असून देवधानोरा येथील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सृष्टी बारावीच्या शिक्षणासाठी बार्शीतील ब्रम्हचैतन्य नगरात भाड्याच्या खोलीत राहत होती. बारावीचा निकाल बुधवारी (दि.8) जाहीर झाला. तिला 65 टक्के गुण मिळाले, मात्र तिची अपेक्षा ही 85 ते 90 टक्के मिळण्याची होती. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तिने राहत्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. पुढील तपास बार्शी पोलीस करत आहेत. तिच्या या टोकाच्या निर्णयामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकारच्या घटना इतर ठिकाणीही घडल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कमी गुण मिळाल्याने कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. गुण पुन्हा मिळवता येतील पण आयुष्य एकदाच मिळते त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशी टोकाची भूमिका घेऊ नये, अशी भावना लोक व्यक्त करत आहेत.