मुंबई- कथितपणे ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. काही आठवड्यांपूर्वी या प्रकरणाने देशभर खळबळ उडाली होती. मात्र प्रत्यक्षात त्याच्याकडे अंमली पदार्थ नव्हते व तो निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणात आर्यनला गोवणाऱ्या अधिकाऱ्याची उचलबांगडीही झाली. मात्र त्यात आर्यनचे नाव सगळीकडे वाईट पध्दतीने पोहाचले. याची अर्थातच त्याला खंत असून त्याची ही व्यथा समोर आहे.
एका अग्रगण्य साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांनी या गोष्टीचा उलगडा केला आहे.
अमली पदार्थ प्रकरणात जेव्हा मी आर्यन खानशी बोलत होतो, तेव्हा तो व्यथित होता. माझा काहीही दोष नसताना माझ्यावर हे आरोप का करण्यात आले, असा सवाल त्याने केला.
माझ्याकडे अंमली पदार्थ सापडले नाहीत, माझा आणि ड्रग्जचा संबंध नाही. तरीही या प्रकरणात का गोवण्यात आले? माझा काहीही दोष नसताना इतके दिवस मला तुरुंगात का ठेवण्यात आले? या प्रकरणामुळे माझी प्रतिष्ठा धुळीस मिळाली, त्याचं काय? असे प्रश्न आर्यन खानने मला विचारले. माझी चूक काय होती आणि मला नेमक्या कुठल्या गुन्ह्याची शिक्षा दिली जात आहे, असे त्याने विचारल्याचे सिंह यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणावर शाहरूख, त्याची पत्नी अथवा स्वत: आर्यन यांनी आतापर्यंत काही भाष्य केले नव्हते. मात्र पंधरा दिवस सगळ्या माध्यमांवर तेव्हा हाच चर्चेचा विषय ठरला होता. आता आर्यन निर्दोष होता व एकूणच हा सगळा प्रकार बोगस होता हे चौकशीत निष्पन्न झाल्यावर आर्यनची भूमिकाही समोर आली आहे.