रायगड -छत्रपती शिवरायांचे स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या व शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर शिवराई सुवर्ण होनच्या प्रतिकृतींचा अभिषेक घालण्यात आला.
या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी गडावर अलोट गर्दी केली. पालखी सोहळ्यात हजारो शिवप्रेमींनी सहभाग घेतला. महिलांनी झिम्मा-फुगडीचा फेर धरत सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संभाजीराजे म्हणाले, सरकारने शिवभक्तांच्या सोयी-सुविधांसाठी काय केले, या प्रश्नाचे उत्तर द्यावे. केवळ शिवछत्रपतींच्या दर्शनासाठी कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता गडावर येणारा शिवभक्त आहे. त्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी
शिवराज्याभिषेक समिती दिवस रात्र राबते. शासन शिवभक्तांची दखल घेणार नसेल तर स्वराज्यासाठी लढा येथूनच सुरू केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वाभिमानाशी कधी तडजोड केली नाही. शिवरायांनी प्रस्थापितांना घेऊन स्वराज्य निर्माण केले नाही. तर विस्थापित मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या विरोधात अनेक पातशाह्या होत्या. त्यावेळी शहाजीराजे व शिवाजी महाराज यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्याची फारशी फिकीर न करता शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. देशाला पहिले स्वातंत्र्य मिळवून दिले. शहाजीराजे व शिवाजी महाराज यांनी कधीच स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. पुरंदरच्या तहात शिवरायांनी दोन पावले मागे राहणे पसंत केले. त्यांनी कोणाचे मांडलिकत्व स्वीकारले नाही, असेही ते म्हणाले.