मुंबई – केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या धोरणामध्ये मोठी चूक झाली असून हे कशामुळे घडले व धोरण कुठे फसले ही भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट करावी, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली. राष्ट्रवादी जनता दरबार उपक्रमास ते उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले, नोटाबंदीचे धोरण भारतीय अर्थव्यवस्थेला अडचण निर्माण करणारे आहे. केंद्र सरकारच्या धोरणाचा हा पराभव आहे. हे कशामुळे घडले व पुढे नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने काय उपाययोजना केली हे केंद्र सरकारने संपूर्ण चौकशी करून जनतेला माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मागील काही दिवसांपासून राज्यभरात हनुमान चालिसाच्या पठणावरून आणि जन्मावरून वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. हनुमानाचा जन्म अंजनेरीला झाला की किश्कंदला झाला हा वाद अनावश्यक आहे. याला फार महत्त्व देऊ नका. महागाई, बेरोजगारी, टंचाई यासारखे अनेक प्रश्न देशासमोर आहेत याकडे लक्ष द्या. आज सगळे ठरवून चालले आहे. जे विषय देशासमोर नाहीत ते विषय काढून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राम जन्म आणि हनुमान जन्म कुठे झाला. हा विषय आजचा नाही, असेही त्यांनी म्हटले.
चौकशीचे आदेश
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांना आलेल्या धमकीची माहिती गृहविभागाकडे आली आहे. याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांना कडक शिक्षा केली जाईल. संबंधितांना पुरेशी सुरक्षा दिलेली आहे, वाटल्यास अजून सुरक्षेत वाढ केली जाईल, अशी माहितीही वळसे-पाटील यांनी दिली.