अहमदाबाद – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या 15 व्या मोसमात एक अनोखा योगायोग समोर आला आहे. राजस्थानचा संघ 2008 सालापासून तब्बल 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे, तर स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेला गुजरात टायटन्सचा संघ पदार्पणातच विजेतेपद साकार करण्यासाठी सहभागी होत आहे. मात्र, यंदाच्या स्पर्धेला प्रारंभ झाल्यापासून या अंतिम सामन्याचा टीआरपी दुप्पट वाढला आहे.
या स्पर्धेच्या सलामीच्या लढतीला जगभरातील तब्बल 13 कोटी लोकांनी पाठिंबा दिला. मात्र, त्यानंतर ही संख्या घटली. जसजशी स्पर्धा पुढे जात राहिली तशी सामन्यांनुसार हा टीआरपी बदलत गेला. जेव्हा साखळी स्पर्धा पार पडली तेव्हादेखील टीआरपी जेमतेम गेल्या वर्षीच्या टीआरपीची बरोबरी करणारा ठरला.
क्रिकेटच्या कोणत्याही सामन्याचा टीआरपी काढायचा असेल, तर सुरुवात मैदानातील प्रेक्षकक्षमतेनुसार गणित करावे लागते. उदाहरणार्थ मैदानावर 40 हजार प्रेक्षक उपस्थित असतील, तर त्याला 100 या संख्येने गुणले जाते. त्यातून येणाऱ्या संख्येच्या 10 टक्के प्रेक्षक संख्या ही ढोबळ मानाने टीआरपी मानली जाते. टेलिव्हिजनवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहात असलेल्या प्रेक्षकांच्या संख्येनुसारदेखील याच गणिताच्या जोरावर टीआरपी काढला जातो.
आयपीएल हे बीसीसीआयचे सर्वात जास्त नफा देणारे प्रॉडक्ट मानले जाते. आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिका जरी सतत दोन महिने खेळवल्या गेल्या तरीही त्यातून आयपीएलइतका नफा मिळत नाही. या स्पर्धेचे सामने जवळपास दोन महिन्यांपेक्षाही जास्त दिवस चालतात, त्यामुळेच या स्पर्धेतून पुढील किमान पाच वर्षे देशांतर्गत क्रिकेटसाठी निधी उभारता येतो.
आता गेल्या दोन मोसमांपासून आधीच्या 12 मोसमांइतका पैसा बीसीसीआयला मिळाला नव्हता. कारण त्यावेळी दोन्ही मोसमांत जगभरात करोनाचा धोका अस्तित्वात होता. मैदानात प्रेक्षकांना मनाई करण्यात आली होती. तसेच प्रायोजकांच्या संख्येवर व त्यांच्याकडून मिळत असलेल्या करार रकमेतही कपात झाली होती. आता करोना जवळपास संपल्यामुळे प्रेक्षकांनाही 100 टक्के उपस्थितीची परवानगी दिली गेली व मूळ प्रायोजकांसह सह प्रायोजकांकडूनही कराराची पूर्ण रक्कम बीसीसीआयला मिळणार आहे. तसेच स्पर्धा कोणतीही असो, त्याच्या अंतिम सामन्याला पाठिंबा जास्त असतो, या वर्षीच्या आयपीएल अंतिम सामन्यालाही असाच मोठा टीआरपी लाभला आहे.