अहमदाबाद – हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये रविवारी अंतिम सामना रंगणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघात जेतेपदासाठी रॉयल लढत होणार आहे. राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी बेंगळुरूचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. राजस्थानचा संघ तब्बल 14 वर्षानंतर पुन्हा एकदा जेतेपदावर नाव नोंदविण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर गुजरात टायटन्स पदार्पणात इतिहास रचण्याच्या उद्देशाने खेळेल.
राजस्थानन 2008मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता. त्यावेळी त्यांनी एम.एस. धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत पहिला आयपीएल विजेता होण्याचा मान पटकावला होता. पण त्यानंतर 14 वर्षे राजस्थानला अंतिम सामना गाठण्यात अपयश आले. अखेर ही प्रतिक्षा शुक्रवारी संपली आणि राजस्थानने अंतिम सामन्यात प्रवेश केला. राजस्थानची आयपीएलचा अंतिम सामना खेळण्याची ही दुसरीच वेळ असणार आहे. तर त्यांचा सामना ज्या संघाविरुद्ध होणार आहे, तो गुजरात टायटन्स पहिल्यांदाच आयपीएलचा अंतिम सामना खेळणार आहे.
मोदी-शहा लावणार हजेरी?
आयपीएल 15 व्या पर्वातील अंतिम सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार असल्याची प्राथमिक माहिती समजते. यामुळे या स्टेडियमसह आसपासच्या ठिकाणी तब्बल 6 हजार पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अंतिम सामन्यापूर्वी समारोप कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात बॉलीवूडमधील अनेक स्टार कलाकारांचा समावेश असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलचा समारोप कार्यक्रम संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होणार असून, पुढील 50 मिनिटांपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर 7:30 वाजता अंतिम सामन्याकरिता नाणेफेक होणार आहे. तर 8:00 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
राजस्थान रॉयल्सची सर्वात मोठी ताकद जोस बटलर आणि युजवेंद्र चहल आहे. या दोघांनी बेंगळुरूच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. जोस बटलरने 800 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडला आहे. तर चहलने आतापर्यत 26 विकेट घेतल्या आहेत. राजस्थानची सर्वात मोठी ताकद हीच आहे. या जोडीला इतर गोलंदाज आणि फलंदाज मदत करत आहेत.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स यंदा तुफान फॉर्मात आहे. पदार्पणाच्या हंगामात गुजरातने फायनलमध्ये धडक मारली. गुजरात टायटन्सने साखळी सामन्यात दहा सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केले होते. तर चार सामन्यात गुजरातचा फक्त पराभव झाला होता. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे.तसेच गुजरात संघाची सर्वात मोठी ताकद म्हणजे, प्रत्येक सामन्यात नवीन मॅचविनर आहे. हा संघ कुण्या एका खेळाडूच्या कामगिरीवर अवलंबून नाही. यामुळे गुजरातला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.