मुंबई – दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचे कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली. यामध्ये मनी लॉंड्रिंगचा संबंध नाही, अशी माहिती राज्याचे मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. दापोलीतील रिसॉर्ट हे सदानंद कदम यांच्या मालकीचे असून त्याच्याशी माझा काही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनिल परब म्हणाले, आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर आणि माझ्याशी संबंधित ठिाकणी छापे टाकले. गेल्या काही दिवसांपासून या अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. दापोलीचे साई रिसॉर्ट हे सदानंद कदम यांचे आहे, तसा दावा त्यांनी कोर्टात केला आहे. तसे सर्व कागदपत्रे ही त्यांनी जमा केली आहेत. हे रिसॉर्ट अजून सुरू झालेले नाही. तरीही या रिसॉर्टमधून पाणी हे समुद्रात जात असल्याचा आरोप करत केंद्रीय पर्यावरण खात्याने तक्रार केली. त्याच तक्रारीवरुन ईडीची आजची कारवाई आहे. हे रिसॉर्ट सुरूच नाही तर कारवाई कशी केली जाते हा प्रश्न आहे.
यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत आता अनिल परब यांनी आपला बोजा बिस्तरा भरावा असा सल्ला परब यांना दिला आहे. तर आज मुंबईत पत्रकरांशी बोलतांना अनिल परब यांचा सातबारा कोरा करणार असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
पत्रकरांशी बोलतांना सोमय्या म्हणाले,’ ईडीच्या धाडीनंतर परब यांचं वक्तव्य मी ऐकले तेव्हा मला ‘तो मी नव्हेच’ या नाटकाची मला आठवण झाली. ‘तो मी नव्हेच’ नाटकासाठी माधव पळशीकरांना अनेक बक्षीसं मिळाली होती. आज जर ते नाटक पुन्हा करायचं ठरलं तर अनिल परब यांना पसंती दिली जाईल.
ते पुढे म्हणाले,’एक माणूस इतका नाटकी बनू शकतो हे उद्धव ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिलं. अनिल परब आपला रिसॉर्टशी काही संबंध नसल्याचं म्हणत आहे. पण मी काढलेल्या १२ मुद्द्यांची उत्तरं का दिली जात नाहीत. उद्धव ठाकरेंनी १९ बंगल्यासंबंधी थोतांड नाटक केलं. अनिल परबही त्याच माळेतले मनी आहेत. अहो मुख्यमंत्री किती लबाडी करणार. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलेला नाही.” असा आरोप किरीट सोमय्यांनी केला.